
Bhandara News : विमाधारक शेतकऱ्यांपैकी ५० टक्क्यांहून अधिक प्रस्ताव फेटाळल्यानंतरही उर्वरित शेतकऱ्यांना परताव्यास विमा कंपनीकडून (Insurance Company) टाळाटाळ होत आहे. (Crop Insurance Scheme)
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. तसेच, पात्र ठरविलेल्या ६१५ शेतकऱ्यांच्या खात्यात देखील कोणत्याच प्रकारची रक्कम जमा करण्यात आली नाही.
पिकांवरील किडरोग, अतिवृष्टी, गारपीट यासह इतर नैसर्गिक आपत्तीत (Natural Calamity) पिकाचे नुकसान (Crop Damage) होते. त्यावेळी जोखीम कमी व्हावी याकरिता शेतकऱ्यांना पीकविमा काढण्यासाठी प्रोत्साहित करण्यावर कृषी विभागाचा भर राहतो. त्यासाठी व्यापक जागृती देखील केली जाते.
मात्र गेल्या चार वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना भरपाईसाठी कंपन्यांकडून झुलवत ठेवले जात असल्याची माहिती आहे. खरीप २०२२ मध्ये शेतकऱ्यांना संततधार पावसाच्या परिणामी मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यांचा उत्पादकता खर्चही निघाला नाही.
परिणामी या वर्षात विमाधारकांना सरसकट परतावा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु शासनाने तसा कोणताच निर्णय घेतला नाही.
शासनाची ही भूमिका वीमा कंपन्यांच्या चांगलीच पथ्यावर पडली आहे. त्याचाच फायदा घेत वीमा कंपनीने मनमानी कारभार चालविल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. मोहाडी तालुक्यात १८४४ शेतकऱ्यांनी वीमा कंपनीकडे ऑनलाइन पद्धतीने पूर्वसूचना प्रस्ताव दाखल केले होते.
यातील फक्त ६१५ शेतकऱ्यांना भरपाईसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. उर्वरित १२२९ शेतकऱ्यांना कंपनीकडून अपात्र ठरविण्यात आले. मात्र पात्र ठरविलेल्या ६१५ शेतकऱ्यांच्या खात्यात देखील कोणत्याच प्रकारची रक्कम जमा करण्यात आली नाही.
परिणामी या शेतकऱ्यांमध्ये देखील असंतोष व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कंपनीने तत्काळ वीमा भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात टाकावी, अशी मागणी होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.