
हिंगोली ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार (National Food Security) पात्र हिंगोली जिल्ह्यातील लाभार्थ्यांना १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत अनुज्ञेय असलेले अन्नधान्य मोफत (Free Grain) वितरित करावे, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीणकुमार धरमकर यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रतिकिलो ३ रुपयांनुसार तांदूळ आणि प्रतिकिलो २ रुपयेनुसार गहू आणि प्रतिकिलो १ रुपयानुसार भरडधान्य वितरित करण्यात येते. केंद्र शासनाने १ जानेवारी, २०२३ पासून हे अन्नधान्य मोफत वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
अन्नधान्य वितरणाबाबत शासनाच्या नियतन आदेशातील इतर सर्वसाधारण सूचना कायम राहतील. मोफत अन्नधान्य वितरणानंतर लाभार्थ्यांना द्यावयाच्या पावतीबाबत संगणक कक्षाकडून स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
`लाभार्थ्यांमध्ये जनजागृती करावी`
केंद्र व राज्य शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी आपल्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना व रास्तभाव दुकानदारांना कळवावे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत रास्तभाव दुकानातून मिळणाऱ्या मोफत अन्नधान्याबाबत पात्र लाभार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील तलाठ्यांमार्फत प्रत्येक गावांमध्ये दवंडी द्यावी.
त्याबाबतचा पंचनामा अहवाल तलाठ्यांमार्फत प्राप्त करून घेऊन कार्यालयात जतन करून ठेवावा व दवंडी दिल्याबाबतचा संकलित पंचनामा अहवाल त्वरित सादर करावा, असे आदेश धरमकर यांनी तहसीलदारांना दिले आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.