
Gondia News गोंदिया ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा (PM Kisan Scheme) लाभ अपात्र व्यक्तींकडून घेण्यात आला. या संदर्भातील खुलासा झाल्यानंतर केंद्र सरकारने लाभार्थी पडताळणीचे आदेश दिले.
त्यानुसार करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणाअंती जिल्ह्यात तब्बल दीड हजार शेतकऱ्यांच्या सातबारा व गट क्रमांकानुसार शेतीच (Agriculture Land) गायब असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तीन टप्प्यात सहा हजार रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्याच्या नावाने शेतीचा सातबारा आहे. अशा व्यक्तीला याचा लाभ दिला जातो. या पैशातून शेतकऱ्यांनी हंगामात मजूरी चुकती करावी किंवा आवश्यक निविष्ठांची खरेदी करावी, असे अपेक्षित आहे.
परंतू काहींनी या योजनेचा गैरफायद घेतला. त्यामध्ये नोकरदार, आयकर भरणाऱ्यांचा समावेश होता. नोकरदार तसेच आयकर भरणारे या योजनेसाठी पात्र नाहीत. परंतू त्यांनी लाभ घेतल्याने त्यांचा हप्ता बंद करण्यात आला. काही बोगस लाभार्थ्यांकडून पैशाची वसूलीही करण्यात आली.
एकाच कुटुंबातील दोघांनी लाभ घेतला असल्यास किंवा अकृषक जमिनीचा सातबारा जोडला असला तरी त्याला अपात्र ठरविण्यात आले आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील ५ हजार ६४५ शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.
यातील दीड हजारावर लाभार्थ्यांची जमीनच पडताळणीअंती त्या भागात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तलाठ्यांच्या माध्यमातून सर्व्हेक्षणाचे हे काम करण्यात आले. काही कुटुंबात पती-पत्नीने योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती समोर आली. त्यातील एकाला अपात्र ठरविण्यात आले.
तालुकानिहाय अपात्र
गोंदिया ः ५६४
तिरोडा ः ४५६
अर्जुनी मोरगाव ः ४५७
गोरेगाव ः २३७
आमगाव ः ४५६
सालेकसा ः २५६
सडक अर्जुनी ः ४८७
देवरी ः ५७६
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.