
अकोला ः जिल्ह्यात अनेक भागातील शेतकऱ्यांना तुटपुंजी पीकविमा भरपाई (Crop Damage Compensation) मिळत असून संतप्त झालेले शेतकरी हा पैसा कंपनीला परत करू लागले आहेत. अकोला तालुक्यातील पातूर नंदापूर येथील शेतकऱ्याला मिळाले ४१ रुपये ९५ पैसे भरपाई सोमवारी (ता. २९) जिल्हाधिकारी कार्यालयात विमा प्रतिनिधीकडे (Crop Insurance Company) परत दिले.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, यावर्षी सततच्या अतिवृष्टीमुळे पातूर नंदापूर परिसरात सोयाबीन, तूर व इतर पिकांचे नुकसान झाले होते. त्यावेळी विमा कंपनीच्या नियमानुसार अनेक शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत विमा कंपनीला सूचना दिली होती. आता पिकांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असून विमा हप्ता ९२७ रुपये भरलेला असतानाही ४१ रुपये ९५ पैसे इतके देण्यात आले.
हा प्रकार शेतकऱ्यांची थट्टा करणारा आहे. काही शेतकऱ्यांना १०० रुपये तर काहींना ३००० रुपयांची तुटपुंजी भरपाई दिल्या गेली आहे. या भागात पीक काढणीच्या काळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला आहे. तेव्हा विमा कंपनीला सूचना देण्यात आली होती. मात्र विमा कंपनी प्रतिनिधीकडून सर्व्हे करण्यात आला नाही. परिणामी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही.
विमा कंपनीचा निषेध व्यक्त करीत शीतल सूरज लाखे यांच्या नावे जमा झालेले ४१ रुपये ९५ पैसे परत करण्यात आले. ही रक्कम विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे परत करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर शीतल लाखे, शंकर मटके, अनुराधा देवळे, भगवंत गवळी, सतीश नागे, विशाल सोनोने, विजय पुंडे, गणेश भोपळे, निलेश देवळे आदींसह इतरांची नावे आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.