
अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः राज्यातील ४० लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी चालू रब्बीतील ई-पीकपाहणी पूर्ण केली आहे.
शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनी उपयोजनांतील (मोबाईल अॅप) ई-पीकपाहणीची मुदत आता संपली आहे.
मात्र तलाठ्यांच्या अधिकारात पुढील महिनाभर पिकांची नोंदणी करता येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
“रब्बीची ई-पीकपाहणी करण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानुसार ४० लाख ३८ हजार शेतकऱ्यांनी १३ फेब्रुवारीअखेर ६५ लाख ४४ हजार हेक्टरवरील पाहणी पूर्ण केली आहे.
शेतकऱ्यांना यंदा पुन्हा मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव नाही. मात्र पीकपाहणी शिल्लक असल्यास कोणताही शेतकरी आपापल्या भागातील तलाठ्याकडे जाऊन नोंद करू शकतो.
तलाठ्याच्या अधिकारात अजून ३० दिवसांपर्यंत नोंदणी सुविधा सुरू राहील,” अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.
रब्बीच्या पीकपाहणी आकडेवारीत इतर बारमाही पिकांची पाहणीदेखील समाविष्ट आहे. त्यामुळे ई-पीकपाहणीच्या आकडेवारीत रब्बीचे पाहणी क्षेत्र यंदा गेल्या हंगामाच्या तुलनेत जास्त दिसते आहे. राज्याच्या रब्बी ई-पीकपाहणीत सर्वाधिक नोंद हरभरा पिकाची झाली आहे.
पाच प्रमुख पिके व क्षेत्र (लाख हेक्टर)
हरभरा-१५.४०
ज्वारी - ४.३५
गहू - २.२२
कांदा - १.४६
मका-१.१५
—--------------
फलोत्पादनात केळी आघाडीवर
राज्याच्या रब्बी हंगामातील फळ लागवडीत ई-पीकपाहणीद्वारे फळबागांची नोंद करण्याची सुविधा शेतकऱ्यांना देण्यात आली होती. त्यात केळी उत्पादकांनी आघाडी घेतली आहे.
नोंदणीत केळी १.१८ लाख हेक्टर, तर संत्री ८५ हजार, डाळिंब ६५ हजार, तर द्राक्ष बागांची नोंद ६५ हजारांच्या पुढे झाली आहे. राज्यात उसाचे क्षेत्र १० लाख हेक्टरच्या पुढे असले, तरी आतापर्यंत ई-पीकपाहणीत केवळ चार लाख हेक्टरची नोंद झाली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.