
Washim News : तलावातील पाणी साठवणक्षमता पुनर्स्थापित करण्यासाठी आणि तलावातील सुपीक गाळ शेतात टाकून शेतीची उत्पादन क्षमता वाढावी यासाठी राज्य शासनाच्या वतीने गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना राबविण्यात येत आहे.
तसेच जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाकडून निती आयोगाच्या माध्यमातून तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात ज्या गावाच्या परिसरात तलाव आहेत, त्या तलाव परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी तलावातील गाळाची मागणी मृदा व जलसंधारण विभाग व ग्रामपंचायतकडे नोंदविल्यास त्यांना तलावातील गाळ उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर व लक्ष्मण मापारी यांनी दिली.
मृद् व जलसंधारण विभागाकडे ६०० हेक्टरपर्यंतचे तलाव आहेत. तर जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाकडे १०० हेक्टरचे तलाव आहेत. ज्या शेतकऱ्यांना तलावातील गाळ आपल्या शेतात टाकायचा असेल, त्यांनी ग्रामपंचायत किंवा संबंधित विभागाशी संपर्क साधावा म्हणजे त्वरित गाळ उचलण्याची कार्यवाही करता येईल.
जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाच्या ६७ तलावांतील ६७ हजार घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन आहे. २५ तलावांतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांनी गाळ मागणी नोंदविल्यास मशिन उपलब्ध करून दिली जाईल. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर आणून गाळ घेऊन जावा, असे आवाहनही जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी यांना केले आहे.
मृद् व जलसंधारण विभागाच्या तलावातील गाळ काढण्याचे ९ कामे सुरू आहे. यामधून २१ हजार ७२५ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना अनुदानातून गाळ उपलब्ध करून देण्यात येईल.
मोठ्या शेतकऱ्यांना स्वखर्चाने गाळ घेऊन जायचा आहे. तरी पावसाळा सुरू होण्यापूर्वी तलावातील जास्तीत जास्त गाळ शेतात पसरून, शेतीची उत्पादनक्षमता वाढविण्यासोबतच तलावातील पाण्याची साठवणक्षमता वाढीसाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.