Gopinath Munde Farmer Scheme : गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना काय आहे?

Accident Insurance Plan : अपघात घडल्यानंतर ३० दिवसांच्या आत परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे. त्यानंतर त्याची तपासणी करून गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या माध्यमातून त्वरित मदत देण्याची कार्यवाही तालुका स्तरीय समितीकडून केली जाते.
Gopinath Munde Farmer Scheme
Gopinath Munde Farmer SchemeAgrowon

विनयकुमार आवटे

Gopinath Munde Farmer Scheme Update : शेती करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा धक्का बसणे इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते.

घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास / त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता शासनाने २००५-०६ पासून शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना कार्यान्वित केली होती.

सन २००९-१० पासून ही योजना शेतकरी जनता अपघात विमा योजना म्हणून ओळखली जाऊ लागली. २०१५-१६ पासून सदर योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना म्हणून कार्यान्वित झाली.

राज्यात या योजनेअंतर्गत २००५-०६ पासून आतापर्यंत जवळपास प्राप्त ६१,००० प्रस्तावांच्या तुलनेत ४१,१३५ प्रस्तावांना ६१० कोटींची मदत देण्यात आलेली आहे.

मात्र विमा कंपनी यांचा असमाधानकारक कामाचा अनुभव, अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाला अत्यंत उशिराने मिळणारी मदत किंवा जुजबी त्रुटी काढून प्रस्ताव नाकारण्याची विमा कंपनी यांची भूमिका यामुळे आता नवीन सानुग्रह अनुदान योजना शासनाने मंजूर केली आहे.

Gopinath Munde Farmer Scheme
Farmer Accident Insurance Schemes : शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या वारसांना मदत

नवीन गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेची वैशिष्ट्ये

१. पूर्वी शासन राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा विमा हप्ता विमा कंपनीकडे भरायची. विमा कंपनी मग प्रस्ताव तपासून मान्य करायची, मात्र यात कधी कधी १ ते २ वर्षांचा विलंब व्हायचा. जुजबी त्रुटी काढून प्रस्ताव परत करणे, अनावश्यक त्रुटी काढून प्रस्ताव नाकारणे अशा बाबी व्हायच्या.

यामुळे अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाला तत्काळ दिलासा देण्याचा हेतू साध्य करताना अडचणी यायच्या. म्हणून आता अपघातग्रस्त कुटुंबाला तत्काळ विहित मदत देण्याच्या हेतूने प्रस्ताव मंजुरीचे अधिकार तालुका स्तरावर तहसीलदार यांचे अध्यक्षतेखालील समितीला दिले आहेत.

२. अपघात घडल्यानंतर ३० दिवसांच्या आत परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे. त्यानंतर त्याची तपासणी करून त्वरित मदत देण्याची कार्यवाही तालुका स्तरीय समितीने करावयाची आहे.

३. अपघातात आता बाळंतपणातील मृत्यूचा देखील समावेश करण्यात आला आहे.

४. वारसाच्या खात्यात रक्कम डीबीटीद्वारे जमा करायची आहे.

योजनेचे स्वरूप :

१) शेती व्यवसाय करताना होणारे अपघात रस्ता/रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, कीडनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या खाल्ल्यामुळे / चावण्यामुळे जखमी/ मृत्यू, दंगल, अन्य कोणतेही अपघात तसेच अपघाताच्या व्याख्येनुसार कोणत्याही अनपेक्षित, आकस्मिक दुदैवी अपघातामुळे होणारे मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास सदर योजनेतून अपघातग्रस्त शेतकरी / शेतकऱ्याच्या वारसदारास सदर योजनेतून लाभ देण्यात येईल.

योजनेची व्याप्ती :

राज्यातील अपघाताच्या दिवशी सर्व वहितीधारक खातेदार असलेले शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही १ सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती ) असे १० ते ७५ वयोगटांतील एकूण २ जणांचा समावेश असेल.

वारसदार :

१) अपघातग्रस्ताची पत्नी / अपघातग्रस्त स्त्रीचा पती, २) अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी, ३) अपघातग्रस्ताची आई, ४) अपघातग्रस्ताचा मुलगा, ५) अपघातग्रस्ताचे वडील, ६) अपघातग्रस्ताची सून, ७) अन्य कायदेशीर वारसदार.

लाभार्थी पात्रता :

राज्यातील १० ते ७५ वयोगटांतील वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही १ सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती)

योजनेमध्ये समाविष्ट बाबी :

१) रस्ता/रेल्वे अपघात, २) पाण्यात बुडून मृत्यू, ३) कीडनाशक हाताळताना अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा, ४) विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, ५) वीज पडून मृत्यू, ६) खून, ७) उंचावरून पडून झालेला अपघात, ८) सर्पदंश व विंचूदंश, ९) नक्षलवाद्यांकडून झालेल्या हत्या, १०) जनावरांच्या खाल्ल्यामुळे / चावण्यामुळे जखमी/ मृत्यू, ११) बाळंतपणातील मृत्यू, १२) दंगल, १३) अन्य कोणतेही अपघात.

योजनेमध्ये समाविष्ट नसणाऱ्या बाबी :

१) नैसर्गिक मृत्यू, २) विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, ३) आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करून घेणे, ४) गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, ५) अमली पदार्थांच्या अमलाखाली असताना झालेला अपघात, ६) भ्रमिष्टपणा, ७) जवळच्या लाभधारकाकडून खून, ८) शरीरांतर्गत रक्तस्राव, ९) मोटार शर्यतीतील अपघात, १०) युद्ध, ११) सैन्यातील नोकरी.

Gopinath Munde Farmer Scheme
APL Farmer Scheme : शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतर

योजनेअंतर्गत मिळणारे लाभ

अपघाताची बाब--- नुकसान भरपाई

१)अपघाती मृत्यू--- २,००,००० रुपये

२) अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे--- २,००,००० रुपये

३) अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे--- २,००,००० रुपये

४) अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी होणे---१,००,००० रुपये

अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे :

१) ७/१२ उतारा

२) मृत्यूचा दाखला

३) शेतकऱ्याचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गाव नमुना नं. ६- क नुसार मंजूर झालेलीवारसाची नोंद.

४) शेतकऱ्याच्या वयाच्या पडताळणीकरिता शाळा सोडल्याचा दाखला / आधार कार्ड / निवडणूकओळखपत्र. ज्या कागदपत्राधारे ओळख/वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्र.

५) प्रथम माहिती अहवाल / स्थळ पंचनामा / पोलिस पाटील माहिती अहवाल.

६) अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे.

योजनेअंतर्गत तालुका स्तरावर प्रस्ताव मंजुरी समितीची रचना

१) तहसीलदार : अध्यक्ष

२) गट विकास अधिकारी (पंचायत समिती) : सदस्य

३) वरिष्ठ पोलिस निरीक्षक (पोलिस) : सदस्य

४) जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा प्रतिनिधी : सदस्य

५) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा प्रतिनिधी : सदस्य

६) तालुका कृषी अधिकारी : सदस्य सचिव

जेव्हा शेतकऱ्यांचे अपघाताचे प्रकरण निदर्शनास येईल तेव्हा संबंधित अपघातग्रस्त शेतकरी / शेतकऱ्याचे वारसदार यांनी सर्व निर्धारित कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे ३० दिवसांच्या आत सादर करावा. तालुका कृषी अधिकारी यांनी प्रस्तावांची छाननी करून पात्र विमा प्रस्ताव संबंधित तहसीलदार यांचे समिती समोर मंजुरीसाठी ठेवावेत.

संपर्क - शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. (लेखक कृषी आयुक्तालय, पुणे येथे कृषी सहसंचालक (वि.प्र.-१) आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com