
पुणे : ‘‘जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदार संघात कांदा आणि बटाटा (Potato Production) पिकाचे उत्पादन अधिक होते. मात्र कांद्याची साठवण (Onion Storage) हा येथील शेतकऱ्यांची प्रमुख समस्या आहे. त्यामुळे या भागात कांदा प्रक्रिया तंत्रज्ञान आणल्यास त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. तसेच बटाटा पिकाचे विमा योजनेत (Potato Crop Insurance) समावेश करण्यासाठी राज्य सरकारला निर्देश देऊ’’, असे आश्वासन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग व जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी दिले.
पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी आमदार माधुरी मिसाळ, जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, माजी आमदार योगेश टिळेकर, धर्मेंद्र केंद्रे उपस्थित होते. शिरूर मतदारसंघातील बागांमध्ये फिरत असताना पटेल यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.
‘‘कांद्याची साठवण ही प्रमुख समस्या आहे. देशात चार ठिकाणी कांदा प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात आले आहे. कांदा १२ महिने कसा टिकेल, याकडे लक्ष दिले जात आहे. असे तंत्रज्ञान या भागात आणल्यास शेतकऱ्याना फायदा होईल,’’ असे पटेल यांनी स्पष्ट केले.
‘‘जलजीवन मिशन’बाबत दुजाभाव नाही’
‘‘खेड तालुक्यात बटाट्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र त्याला विम्याचे संरक्षण नाही. याचा विचार करून विशेष बाब म्हणून या पिकाचा विमा योजनेत समावेश करण्यासाठी राज्य सरकारला निर्देश देऊ,’’ असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. ‘जलजीवन मिशन’च्या कामांबाबत केंद्र सरकार दुजाभाव करत नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.