
वाशीम जिल्ह्यातील एरंडा येथील जयकिसान शेतकरी गटाने बांधावर प्रयोगशाळा उभारली आहे. ट्रायकोडर्मा, विविध जैविक स्लरी, गांडूळखत निर्मितीचे प्रशिक्षण घेऊन त्यांचे उत्पादन त्या माध्यमातून सुरू केले आहे. गटातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, हरभरा, गहू व फळपिकांत त्याचा वापर करून उत्पादन व गुणवत्तेत वाढ करण्यास सुरवात केली आहे. वाशीम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील एरंडा गावची सोयाबीन, मूग, उडीद ही मुख्य पिके आहेत. काही शेतकरी हंगामी भाजीपाला पिकवतात. फळबागाही उभ्या राहात आहेत.याच गावातील १६ शेतकऱ्यांनी एकत्र येत २०१४ मध्ये जयकिसान शेतकरी गटाची स्थापना केली. दीपक भीमराव घुगे हे गटाचे अध्यक्ष झाले. शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी, मातीची सुपीकता जपण्यासाठी त्यांनी रासायनिक निविष्ठांचा वापर कमी करून जैविक, सेंद्रिय शेतीवर भर दिला. सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील तज्ज्ञ व मूळ मालेगाव येथील डॉ. संतोष चव्हाण यांचे मार्गदर्शन त्यांना लाभू लागले. उत्पादनात वाढ जेव्हापासून गटाने सेंद्रिय पद्धतीवर भर देऊन शेती सुरू केली तेव्हापासून सर्व नोंदी ठेवल्या असल्याचे अध्यक्ष घुगे यांनी सांगितले. त्यानुसार पूर्वी सोयाबीन पिकात एकरी ९०० ग्रॅमपर्यंत कीडनाशकांचा वापर व्हायचा. आता तो १३८ ग्रॅमपर्यंत खाली आणल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ७० ते ८० टक्के जैविक- सेंद्रिय तर २० ते ३० टक्केच रसायनांचा वापर होतो. सेंद्रिय घटकांच्या वापरामुळे मातीची पोत, सुपीकता यात वाढ झाली आहे. सन २०१३ च्या दरम्यान रासायनिक पद्धतीत सोयाबीनचे एकरी ५ क्विंटल, तुरीचे दोन क्विंटल, हरभरा चार तर गव्हाचे आठ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळायचे. आता सोयाबीनचे एकरी १० क्विंटल, हरभऱ्याचे ५ ते १० क्विंटल, तुरीचे ५ ते ६ क्विंटल, गव्हाचे १५ ते १८ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत आहे. प्रयोगशाळेची उभारणी डॉ. चव्हाण यांनी सुमारे दीड वर्षांपूर्वी फार्मलॅब अर्थात बांधावरील प्रयोगशाळेची संकल्पना गटासमोर मांडली. गटाने ती त्वरित स्वीकारली. त्यानुसार प्रशिक्षण घेत भाडेतत्वावर घेतलेल्या जागेत कामास सुरवातही झाली. रोटरी शेकर , ॲटोक्लेव्ह , मिक्सर, ग्लास, पेट्रीडिश आदी विविध साहित्य घेतले आहे. प्रयोगशाळेत कडधान्य स्लरी, डिकंपोस्ट कल्चर, ट्रायकोडर्मा, सेंद्रिय व गांडूळखत आदींची निर्मिती केली जाते. सर्व शेतकऱ्यांनी मिळून पैसा उभारीत प्रयोगशाळेसाठी दीड लाख रुपये गुंतवले आहेत. केवळ गटातील नव्हे तर अन्य ५०० ते ८०० शेतकरी देखील गटाला जोडले जात आहेत. हे सर्व शेतकरी हंगामी पिकांसह हळद, डाळिंब, संत्रा, लिंबू आदी पिकांत या जैविक निविष्ठांचा वापर करतात. गटातील काहींनी पुण्यातही प्रशिक्षण घेतले आहे. युरियाचा वापर थांबवला गटातील विजय घुगे २७ एकर शेती कसतात. ते म्हणाले की मागील सहा वर्षांपासून कोणत्याच पिकाला युरिया देत नाही. आम्ही प्रयोगशाळेत तयार करीत असलेल्या घटकांद्वारे नत्राची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. पूर्वी कीडनाशक फवारणीचा एकरी खर्च १२०० ते १५०० रुपये यायचा. जैविक निविष्ठांच्या वापरातून तो १५० ते २०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. मान्यवरांच्या भेटी परम महासंगणकाचे निर्माते व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी गटाच्या प्रयोगशाळेला भेट देत त्यांना प्रोत्साहित केले आहे. वाशीमचे तत्कालीन जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक यांनी संवाद साधला. तर सध्याचे जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांनी भेटी दिल्या आहेत बांधावरील प्रयोगशाळा उभारण्याचा उद्देश
याविषयी डॉ. संतोष चव्हाण म्हणाले की अशा प्रकारे प्रयोगशाळा उभारून शेतकरी निविष्ठा निर्मितीत स्वयंपूर्ण होऊ शकतात. विक्रीचा कोणता उद्देश यात ठेवण्यात आलेला नाही. ज्या शेतकऱ्यांच्या मुलांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयात शिक्षण घेतले आहे, अशांना या प्रशिक्षणचा विशेष फायदा होऊन तेच पुढे मुख्य प्रशिक्षक होऊ शकतात. पुढील काळात सूक्ष्मजीवावर आधारित अन्य कीडनाशके निर्मिती शेतकरी स्वतः करू शकतील असा प्रयत्न आहे. प्रयोगशाळेत तयार केलेले घटक
संपर्क- दीपक घुगे- ७७९८८४९८२१ अध्यक्ष, ‘जयकिसान’ गट
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.