
भारतीय कृषी तंत्रज्ञान (Agri-technology) क्षेत्रात येत्या काळात मोठ्या वाढीची शक्यता आहे. बाजारातील कृषी तंत्रज्ञानाची मागणी, गुंतवणुकीचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन (Production) आणि आर्थिक उत्पन्न (Income) वाढवण्यासाठी संशोधकांकडून नवनवीन अविष्कार करण्यात येत आहेत.
येत्या काही वर्षांत कृषी क्षेत्राचे चित्र पालटून टाकण्याची क्षमता कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः काढणी-कापणीनंतरच्या पायाभूत सुविधांमध्ये करण्यात येणाऱ्या तांत्रिक सुविधांचा थेट लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.
विविध कृषी तंत्रज्ञान संस्थांकडून कृषी मालाची साठवणूक, वाहतूक आणि पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी कृषी तंत्रज्ञान कंपन्यांनी केलेल्या संशोधनामूळे एकूण कृषी क्षेत्राच्या योगदानातही वाढ होणार असल्याचा विश्वास तरणजित सिंग ब्रम्हा यांनी बिझनेस लाईनमधील लेखात व्यक्त केला आहे.
कृषी क्षेत्रातील वाटचालीच्या सध्याच्या टप्य्यात कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी कृषी मूल्य साखळीवर लक्ष केंद्रित केले आहे. याखेरीज कृषिमाल आणि बाजारपेठा जोडण्याची व्यवस्था विकसित करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे एकाचवेळी कृषी उत्पादन (Agriculture Production) वाढवणे आणि कृषी उत्पादनांना रास्त दर मिळवण्यासाठी बाजारपेठांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी या क्षेत्रातील स्टार्टप्स अग्रेसर आहेत.
२०२५ अखेरीस भारतीय कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात ३० ते ३५ अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचा अंदाज आहे. आजमितीस देशभरात कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात ६०० पेक्षा स्टार्टप्स सक्रिय असून हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. भारतीय कृषी क्षेत्रातील संभाव्य विकासाची शक्यता लक्षात घेत अनेक जागतिक कंपन्याही भारतीय कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणुकीस उत्सुक असल्याचेही ब्रम्हा म्हणाले आहेत.
कृषी मालाच्या गुणवत्ता निर्धारणात डिजिटायझेशन निर्णायक भूमिका बजावणार आहे. कृषी कमोडिटीज क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे या क्षेत्रातील प्रक्रियेचा वेग, त्यातील पारदर्शकताही वाढणार आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), मशीन लर्निंग, ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज ( IoT) आणि इतर तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टप्स कृषी क्षेत्रातील गरजा ओळखून त्यांच्या त्वरित पूर्ततेवर भर देत आहेत. किसान ड्रोनच्या माध्यमातून फवारण्या केल्या जाणार आहेत. भूमी अभिलेखांचे कामही अधिक अचूक, पारदर्शक होणार आहे.
आजवर कृषी क्षेत्राने भारतातील मोठ्या मनुष्यबळाला रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अलीकडील काही वर्षांत माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रानेही भारतातील कुशल मनुष्यबळास सामावून घेतले आहे. कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक वाढीच्या शक्यतेमुळे कुशल मनुष्यबळ कृषी क्षेत्राशी जोडल्या जाणे शक्य होणार असल्याचेही ब्रम्हा म्हणाले आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.