
Onion Market Update जळगाव ः भारत कांदा लागवडीसह उत्पादन (Onion Production) आणि निर्यातीत (Onion Export) जगात पहिल्या क्रमांकाचा देश आहे. देशातून निर्यात अधिकाधिक होण्यासह बाजारातील जोखीम कमी करण्यासंबंधी ठोस निर्यात धोरण आखणे आवश्यक आहे.
युरोपात कांदा निर्यातीची संधी मिळावी यासाठी राजगुरुनगर (जि. पुणे) येथील राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्रात संशोधन सुरू आहे, अशी माहिती इंडियन सोसायटी ऑफ अॅलम्स (राजगुरुनगर, जि. पुणे)चे अध्यक्ष तथा बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. ई. लवांडे यांनी ‘अॅग्रोवन’शी बोलताना दिली.
डॉ. लवांडे कांदा व लसूण विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रासाठी जळगाव येथील जैन हिल्सवर आले होते. यानिमित्त ‘अॅग्रोवन’ने कांदा निर्यातीतील संधी, गरजा, देशाचे उत्पादन, बाजारातील अस्थिरता, वाणांची निवड, लागवड, नैसर्गिक आपत्तीने होणारे नुकसान आदी मुद्द्यांवर डॉ. लवांडे यांच्याशी चर्चा केली.
डॉ. लवांडे म्हणाले, की युरोपात २०० ते २५० ग्रॅम एवढ्या आकाराचा कांदा प्रचलित किंवा हवा आहे. त्याचे उत्पादन देशात होत नाही. देशात १०० ते १५० ग्रॅम एवढ्या आकाराच्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते.
युरोपात पांढरा व लाल या दोन्ही कांद्याची निर्यात शक्य आहे. त्यासाठी राजगुरुनगर (जि. पुणे) येथील कांदा व लसूण संशोधन केंद्रात संशोधन सुरू आहे. देशात कांद्याचा बाजार अस्थिर असतो. ही बाब लक्षात घेता कांद्याचे ग्राहक हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
त्यासाठी कुठल्या काळात कुठल्या देशात कांद्याची गरज असते, कुठल्या जातींची किंवा कांदा वाणांना परदेशात पसंती आहे, त्यांची गरज किती आहे, याची माहिती अपेडा, नाफेड या संस्थांनी घ्यायला हवी.
देशात निर्यातक्षम कांद्याचे मोठे उत्पादन घेतले जाते. परंतु देशाची एकूण निर्यात अलीकडे १६ ते १७ लाख टनांपर्यंतच आहे. निर्यात प्रामुख्याने दक्षिण आशियायी देश, आखातात होत असते. ही निर्यात वाढण्यासाठी ठोस निर्यात धोरणही असायला हवे.
कांदा हे पीक महाराष्ट्रात मोठे आहे. देशाच्या कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ४० टक्के एवढा आहे. तसेच कांद्याचे क्षेत्र देशात १५ ते १६ लाख हेक्टर असते.
यातील एकट्या महाराष्ट्रात सात ते आठ लाख हेक्टरवर कांदा लागवड केली जाते. यंदा ही लागवड दोन्ही हंगामात मिळून सात लाख हेक्टर एवढी झाली आहे.
तर उत्पादन राज्यात १०५ ते ११० लाख टन एवढे येते. तसेच देशात कांदा साठवण क्षमता राजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन केंद्राच्या शिफारशी, संशोधन यामुळे वाढली आहे. ही साठवण क्षमता २००४ पर्यंत चार लाख टन एवढी होती.
ती आता ४० लाख टन एवढी झाली आहे. त्यात आणखी वाढ अपेक्षित आहे. त्यात यश येईल. कांदा बीजोत्पादनासंबंधी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
अलीकडे बियाण्याची शुद्धता महत्त्वाची आहे. त्यासाठी एक गाव एक जात किंवा एक वाण हा उपक्रम राबवायला हवा. बियाणे उत्पादक कंपन्यांनी त्यासंबंधी पुढे यावे, असेही लवांडे म्हणाले.
वाण निवड महत्त्वाची ः लवांडे
कांदा लागवडीसंबधी वाण निवडही महत्त्वाची आहे. त्यात रब्बीत भीमा शक्ती, भीमा किरण, भीमा लाइट रेड या जाती चांगल्या व टिकाऊ आहेत. खरिपात बिमा डार्क रेड, भीमा सुपर या जाती लाभदायी ठरतात.
साठवण, रचना यासंबंधी कांदा व लसूण संशोधन संस्थेने ज्या शिफारशी, निर्णय, संशोधन केले, त्याचा लाभ होत आहे. ठिबक, सूक्ष्मसिंचन तंत्रज्ञानामुळे उत्पादन वाढले असेही डॉ.लवांडे यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.