
Weather Update : शेती क्षेत्रात सध्या चर्चा आहे एल निनोची. कारण एल निनोचा माॅन्सूनवर परिणाम होण्याची शक्यता असते. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजेच शेती. कोरोना काळात आणि कोरोनानंतर सलग दोन वर्षे भारतीय अर्थव्यवस्थेला शेतीनेच आधार दिला. निती आयोग, रिझर्व्ह बॅंक आणि सरकारनेही हे मान्य केलं.
आजही भारतीय हातांना सर्वाधिक रोजगार शेती क्षेत्रातच मिळतो. मागील दोन वर्षे देशात चांगले पाऊसमान झाले. त्यामुळे अन्नधान्यासह शेती उत्पादनात भरगच्च वाढ झाली. पण दर ४ ते ७ वर्षांनी येणारी एल निनो ही वातावरणीय स्थिती यंदा उद्भवण्याची शक्यता आहे.
एल निनोमुळे काही देशांमध्ये दुष्काळ पडतो तर काही देशांमध्ये चांगलं पीक पाणी मिळते. यंदा भारतावरही अल निनोचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
भारताला यंदा एल निनोचा फटका बसेल, असे सांगितले जाते. पण भारतीय हवामान विभागाचा अंदाज काय आहे, तेही पाहावे लागले. भारतीय हवामान विभागाने जानेवारी ते मार्च २०२३ यादरम्यान ला निना स्थिती राहील, असा अंदाज दिला होता.
हा अंदाज खरा ठरत मार्च महिन्यात देशात विक्रमी पाऊस झाला. तर जुलै ते सप्टेंबर या काळात एल निनो स्थिती निर्माण होण्याची शक्यता ५० टक्के असल्याचे माॅन्सून मिशन फोरकास्टने म्हटले होते.
पण एल निनोच्या काळात कमीच पाऊस पडतो किंवा दुष्काळ पडतोच असं नाही. म्हणजेच एल निनोमुळे शेतीला फटका बसेलच असे नाही, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले.
भारतीय हवामान विभागाने यंदा सरासरी म्हणजेच ९४ ते ९६ टक्के पाऊस पडेल, अशी शक्यताही व्यक्त केली. काही हवामान बदलविषयक अभ्यासांमधून अल निनोचा परिणाम सौम्य किंवा मध्यम स्वरुपाचा राहू शकतो, असं स्पष्ट झालं.
तर एल निनोच्या काळात नेहमीच माॅन्सून कमी होतो असंही नाही. १९९७ साली अल निनोची तीव्रता अतिशय जास्त होती. पण यावर्षी एल निनोचा माॅन्सूनवर काहीच परिणाम झाला नाही. तसचं पृथ्वी विज्ञान मंत्रालयातील जाणकारांच्या मते, एल निनो स्पष्ट दिसतो.
पण एल निनोचा परिणाम कमी होण्यासाठी काही घटकही सक्रीय आहेत. भारतात माॅन्सून जूनमध्ये सुरु होऊन सप्टेंबरमध्ये संपतो. तर एल निनोचा ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये येऊ शकतो. म्हणजेच निम्म्यापेक्षा अधिक माॅन्सून काळ संपलेला असेल.
हे पारंपरिक उपाय प्रभावी
खरिप हंगाम मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो. त्यामुळं भारतीय हवामान विभागासह इतरही सरकारी संस्था शेतकऱ्यांना अल निनो आणि माॅन्सूनविषयीची माहिती वेळोवेळी देत आहेत. पुढील काळात हवामान विभागाने पाऊस कमी होण्याचा अंदाज व्यक्त केलाच तर जाणकारांनी काही उपाय करण्याची आवश्यकताही व्यक्त केली.
जमिनितील ओलाव्याचे संवर्धन आणि पीक फेरपालट करून प्रभावी पाणी व्यवस्थापन तंत्राचा अवलंब महत्वाचा आहे. पाण्याचा अपव्यय टाळल्यास शेतीपिकांना पाणी उपलब्धता वाढू शकते. हे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे ठरेल.
पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे जतन केल्यास पाण्याची उपलब्धता वाढेल. त्यासाठी उताऱ्यावर बंधारा बांधणे, चर खोदणे आणि नाला बंधारा उभारणे हे पारंपरिक उपाय करू शकतो. तर खरिप हंगामात दुष्काळ सहनशील पिक वाणांची लागवडही करता येईल, असा प्राथिमक सल्लाही दिला जात आहे.
अन्नधान्याचा बफर स्टाॅक महत्वाचा
देशाची अन्नसुरक्षा अबाधित राखण्यासाठी सरकार दरवर्षी अन्नधान्याची खरेदी करत असते. त्यात गहू, भात, भरडधान्य आणि कडधान्यांचा समावेश असतो. तसचं हा बफर स्टाॅक दुष्काळ किंवा कमी पाऊस पडलेल्या वर्षी देशाला आधार देत असतो. यंदा एल निनोची भीती व्यक्त केली जाते. त्याचा परिणाम नेमका काय राहू शकतो, हे आताच स्पष्ट नाही.
येणाऱ्या काळात हवामान विभागाच्या अंदाजावरून एल निनोचा परिणाम स्पष्ट होईल. पण सरकारही बफर स्टाॅक वाढवत आहे. कृषी मंत्रालयाच्या माहीतीनुसार, सरकारकडे सध्या १५९ लाख टन आणि भाताचा १०४ लाख टनांचा बफर स्टाॅक आहे.
तर अन्नसुरक्षा नियमानुसार सरकारकडे गव्हाचा १३८ लाख टन आणि भाताचा ७६ टन बफर स्टाॅक असणे गरजेचे आहे. तसेच चालू हंगामात सरकारची खरेदी सुरुच आहे. बफर स्टाॅकच्या माध्यमातून सरकार आपात्कालीन परिस्थिती हाताळू शकते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.