
Weather Update : मागील काही दिवसांपासून जगभरात अल निनोची चर्चा आहे. अल निनोने केवळ शेतकऱ्यांचीच नाही तर धोरणकर्ते आणि सरकारचीही झोप उडवली. अल निनोच्या काळात कमी पाऊस आणि दुष्काळाची शक्यता असते. यामुळं भारताचीही चिंता वाढली.
अल निनोमुळं भारतात यंदा काही पिकांचे उत्पादन घटू शकते, असा अंदाज संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न आणि कृषी संघटना अर्थात एफओएने व्यक्त केला.
मागील तीन वर्षांमध्ये ला निना स्थिती होती. त्यामुळे भारतासह काही देशांमध्ये विक्रमी पीक उत्पादन झालं, तर काही देशांना फटका बसला. पण यंदा अल निनोची स्थिती आहे.
अल निनोमुळे यंदा ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि इतर दक्षिण आशियातील देशांमध्ये भीषण दुष्काळ पडू शकतो. तर अल निनोमुळं जगातील पीक उत्पादकता जवळपास २५ टक्क्यांपर्यंत घटते, हे काही वर्षांतील आकडेवारीवरून स्पष्ट झाल्याचे एफएओने सांगितले.
पण अल निनोमुळे जागतिक सरासरी सोयाबीन उत्पादन वाढते. कारण सोयाबीन उत्पादक देशांमध्ये पावसाची स्थिती चांगली राहते. तर मका, भात आणि गहू उत्पादक देशांमध्ये पावसाचं प्रमाणं कमी असतं. त्यामुळं सरासरी मका, भात आणि गहू उत्पादनात घट होते. इतर पिकांच्या तुलनेत मका उत्पादनाला सर्वाधिक फटका बसतो.
जिरायती पिकांची उत्पादकता मोठ्या प्रमाणात कमी होते. अल निनोमुळे जागातील एका भागात उत्पादन कमी होते. पण दुसऱ्या भागात उत्पादन वाढल्याने अनेक पिकांची सरासरी भरून निघते, असेही एफएओने स्पष्ट केले.
अल निनोच्या प्रभावामुळे भारतासह आग्नेय आशियातील भात उत्पादनाला फटका बसत असतो. तर आग्नेय ऑस्ट्रेलियातील गहू पिकाचं उत्पादन कमी राहू शकते. पण मध्यपश्चिम अमेरिका आणि आग्नेय दक्षिण अमेरिकेत मका आणि सोयाबीन उत्पादनात वाढ दिसू शकते. मात्र चीन, मध्य आशिया आणि आग्रेय दक्षिण अमेरिकेत गव्हाचे उत्पादन वाढू शकते, असा अंदाज एफएओने व्यक्त केला.
उत्तर चीन, दक्षिण मेक्सिको, आग्नेय ब्राझील, इंडोनेशिया या देशांमध्ये सोयाबीन आणि मका उत्पादनाला फटका बसू शकतो. भारताच्या दृष्टीने विचार करता सोयाबीन, मका आणि भात पिकाचे उत्पादन कमी होऊ शकते.
भारतात अल निनोचा प्रभाव माॅन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यापासून जाणवू शकतो, असा सध्याचा अंदाज आहे.भारतातील पिकांना शेवटच्या टप्प्यात पावसाचा ताण बसून उत्पादकता कमी राहील, असाही अंदाज एफओएने व्यक्त केला.
पुढील वर्षी भारतात सोयाबीन, कापूस, मका आणि तांदूळ तसचं गहू उत्पादनाला किती फटका बसेल हे आताच सांगता येत नाही. पण अल निनो स्थितीचा फटका बसला तर सोयाबीन, मका, कापूस धान्य पिकांच्या दरवाढीला आधार मिळू शकतो. तर भारताला अनेक पिकांच्या बाबतीत आपली गरज आयातीतून भागवण्याची वेळ येऊ शकते.
पण भारतासारखा मोठ्या ग्राहकाची मागणी वाढल्यास आंतरराष्ट्रीय बाजारातही दर वाढतात हा आपला आजवरचा अनुभव आहे. त्यामुळं शेतीमाल बाजाराची दिशाही अल निनोवर अवलंबून आहे.
भारतीय हवामान विभागाचा माॅन्सूनचा सुधारित अंदाज आल्यानंतर स्थिती काहीशी स्पष्ट होईल. पण यंदा पाऊसमान कसं राहते याकडे शेतीमाल बाजाराचं लक्ष आतापासूनच लागून आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.