
Ratnagiri Rain News : हवामान विभागाच्या (Weather Department) अंदाजानुसार शुक्रवारी (ता. १७) पहाटेच्या सुमारास ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र वादळी पावसाने हजेरी लावली. दुपारपर्यंत ढगाळ वातावरण (Cloudy Weather) होते.
त्यामुळे आंबा बागायतदार धास्तावले असून किडी-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यापासून हापूस सुरक्षित ठेवण्यासाठी कीडनाशक फवारणीचा खर्च बागायतदारांना करावा लागणार आहे.
हवामान विभागाने १८ मार्चपर्यंत जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविली होती. त्याप्रमाणे बुधवारी (ता. १५) रात्री रत्नागिरीत काही ठिकाणी हलका पाऊस पडला.
गुरुवारी (ता. १६) दिवसभर हवेत गारवा होता. दुपारी उन्हाचा कडाका जाणवत होता; मात्र सायंकाळी ढगाळ वातावरण तयार झाले. रात्रीही उष्मा अधिक जाणवू लागला.
शुक्रवारी (ता. १७) पहाटेच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. पावसाची हलकी सरही पडू लागली. सुमारे अर्धा तास पावसाची रिपरिप सुरू होती. साडेचारच्या सुमारास वातावरण शांत झाले. हवेत गारवाही जाणवू लागला.
सकाळी ११ पर्यंत आकाश ढगाळलेले होते. त्यानंतर हळूहळू ऊन वाढू लागले; परंतु हलके वारे वाहत असल्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती.
रत्नागिरी तालुक्यात कोतवडे, गणपतीपुळे, पावस, मजगाव, खाडी पट्टा यासह संगमेश्वर, लांजा, राजापुरातील काही भागांत पावसाने हजेरी लावली.
पावसामुळे तुडतुड्यासह अन्य किडी व रोग आंब्याच्या मोहोरावर आढळून येण्याची भीती बागायतदारांना सतावू लागली आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी कीडनाशक फवारणी करण्याचा खर्च बागायतदारांना करावा लागणार आहे.
काही बागायतदारांनी तत्काळ फवारणी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांत पहिल्या टप्प्यातील आंबा बाजारात पाठवण्यास रत्नागिरीतील बागायतदारांनी सुरुवात केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.