मधमाशीपालन अन् संवर्धनही...

कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी(ता. करवीर) येथील दयावान श्रीकांत पाटील हा युवा शेतकरी दहा वर्षांपासून सातेरी मधमाशीपालनात सातत्य ठेवून आहे. शेतकऱ्यांना मधुमक्षिकापालनाचे प्रशिक्षण देत त्यांच्या संवर्धन चळवळीला त्याने मोठा हातभारही लावला आहे.
मधमाशांना कोणतीही इजा न पोचवता मधपोळे काढण्याचा दयावान पाटील यांचा प्रयत्न असतो.
मधमाशांना कोणतीही इजा न पोचवता मधपोळे काढण्याचा दयावान पाटील यांचा प्रयत्न असतो.

कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी (ता. करवीर) येथील दयावान श्रीकांत पाटील हा युवा शेतकरी दहा वर्षांपासून सातेरी मधमाशीपालनात सातत्य ठेवून आहे. स्वतःच्या शेतात परागीभवनासाठी मधपेट्या ठेवण्याबरोबरच अन्यत्रही तो पेट्या ठेवण्यास देतो. शेतकऱ्यांना मधुमक्षिकापालनाचे प्रशिक्षण देत त्यांच्या संवर्धन चळवळीला त्याने मोठा हातभारही लावला आहे.  कोल्हापूर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कणेरी (ता. करवीर) येथे दयावान श्रीकांत पाटील या तरुणाची अडीच एकर शेती आहे. भात, भुईमूग, भाजीपाला व उसाचे उत्पादन घेतात.  महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांना लघू उद्योगाविषयी आत्मीयता निर्माण झाली. यातूनच त्यांनी मधुमक्षिकापालनाकडे लक्ष दिले. पुणे येथील मध्यवर्ती मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (सीबीआरआयटी) येथे त्यासाठी रीतसर प्रशिक्षण घेतले. ही साधारण २०१० च्या सुमाराची गोष्ट आहे. गावापासून प्रसिद्ध कणेरी मठ जवळच आहे. मठाधिपती श्री काडसिद्धेश्‍वर महाराज यांनी दयावान यांना या पूरक व्यवसायासाठी अधिक प्रोत्साहन दिले. सुरुवातीचे काही दिवस त्या परिसरात मधपेट्या ठेवून मधाचे उत्पादन घेण्यास सुरू केले. परंतु नैसर्गिक परिस्थितीमुळे अपेक्षित उत्पादन येत नसल्याने पर्याय शोधायला सुरुवात केली.   दहा पेट्यांपासून सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यात जैवविविधता मोठी आहे. दाजीपूरसारखे अभयारण्य आहे. तेथे जाऊन या व्यवसायास चालना द्यावी असा विचार त्यांच्या मनात आला. त्यानुसार धनराज यांनी तेथील वातावरणाची माहिती घेतली. अभयारण्याच्या शेजारील परिसरात सुरुवातीला १० मधपेट्या ठेवल्या. त्यासाठी एक लाख रुपये भांडवल गुंतवले. तेथील अधिकाऱ्यांनाही या कल्पनेस प्रोत्साहन दिले. तेव्हापासून आजतागायत ही पद्धत अमलात आणली आहे. पेट्या बसविल्यानंतर ठरावीक दिवसांनी तिथे जाऊन परिस्थिती पाहिली जाते. धनराज यांच्यासोबत तीन मजूर काम करतात.  मधाचे संकलन व विक्री व्यवस्था

  • सातेरी मधमाशी या परिसरात असल्याने तिचा मध संकलित होतो. पाव किलो, अर्धा किलो अशा बाटल्यांमध्ये पॅकिंग केले जाते. मधाची नैसर्गिक गुणवत्ता पाळली जाते. त्यामुळे मधाला मागणी असते. सुरुवातीला ओळखीच्या ग्राहकांना विक्री केली. आता दहा वर्षांमध्ये ग्राहकांचे नेटवर्क तयार झाले आहे. अलीकडील काळात ‘सोशल मीडिया’तील प्रकारांची मदत घेतली जाते. विविध शेतकरी गटांच्या व्हॉट्‌सॲप ग्रुपवर माहिती प्रसारित केली जाते. विविध कार्यक्रमांतून मध कसा संकलित केला जातो याची माहिती धनराज देतात. 
  • ठिकठिकाणी भटकंती करून आग्या मधमाशीचाही मध संकलित केला जातो. त्यांना कोणतीही हानी न पोहोचता मध काढला जात असल्याने निसर्गाचा समतोल कायम राहिला.
  • प्रसंगी घरी जाऊन व कुरिअरमार्फतही विक्री होते. औषधी वापरासाठीही वापर होत असल्याने अनेक रुग्ण नेहमीचे ग्राहक बनले आहेत. 
  • ऑक्टोबर ते मे हा मध संकलनाचा मुख्य कालावधी असतो. संकलन सहा महिने असले, तरी विक्री वर्षभर सुरू असते. 
  • हवामानातील बदल व पीक परिस्थितीनुसार मध संकलित होतो. तरीही वर्षभरात सातेरी मधमाशीचा ३०० किलोपर्यंत तर आग्या मधमाशीचा १०० किलोपर्यंत मध संकलित होतो. प्रति किलो ६०० रुपये दराने विक्री होते. ‘अलकानंद हनी’ ब्रँड तयार केला आहे. विक्री अन्य बाजारपेठेत करण्याचा प्रयत्न आहे. 
  • कणेरी परिसरात तसेच शिवाजी विद्यापीठ परिसरात परागीभवनासाठी, राधानगरी भाग आदी भागातही  पेट्या ठेवल्या आहेत. 
  • परागीभवनासाठी प्रयत्न दयावान सांगतात, की निसर्गात मधमाश्‍यांची संख्या कमी झाल्यास परागीभवन होत नाही. त्यामुळे फळधारणा होत नाही. उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. कणेरी येथील काही शेतकऱ्यांच्या शेतात आम्ही पेट्या ठेवण्याचा चांगला परिणाम पाहिला आहे. अनेक शेतकऱ्यांना त्यापासून प्रेरणा मिळाली आहे. त्यासाठी पेट्या मोफत देत आहे.   मध पेट्यांचे उत्पादन व्यवसाय वृद्धी करताना यंदापासून मधपेट्या तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. सध्या कोरोना संकटामुळे कारागीर नसल्याने त्यात नियमितता नाही. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्याची विक्री सुरू केली आहे. प्रति रिकामी पेटी १८०० रुपयांच्या आसपास विकली जाते. भविष्यात मधपालनासाठी ज्या निविष्ठा लागतील त्याही पुरवण्याचा विचार आहे. कणेरी मठ, कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा खादी ग्रामोद्योग, शिवाजी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागाचे डॉ. ए. डी. जाधव यांच्यासह विविध संस्थांच्या संपर्कात दयावान असतात.  विविध उपक्रम

  • कोल्हापूर शहर व परिसरात इमारतींवर बांधल्या जाणाऱ्या पोळ्यांचे सुरक्षित स्थलांतर करून मधमाश्यांना जीवदान देण्याचे काम दयावान यांनी केले आहे. 
  • युवा शेतकरी, विद्यार्थी, महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम. सुमारे एक हजार जणांना प्रशिक्षित केले. 
  • प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांना आवाहन केले जाते. शेतकरी एकत्र आल्यानंतर प्रशिक्षण दिले जाते. 
  • ऑनलाइन प्रशिक्षण देण्याबाबतही प्रयत्न सुरू आहेत.
  • -दयावान पाटील,  ९०९६३८५७१२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com