देगलूर तालुक्याची पेरू पिकात नवी ओळख

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्याची ओळख हंगामी पिकांकडून आता पेरू पिकासाठी होऊ लागली आहे. तालुक्यात अलीकडील वर्षांत सहाशे एकरपर्यंत त्याचे क्षेत्र पोचले आहे.
 after grading Guava fruits are packed in boxes
after grading Guava fruits are packed in boxes

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्याची ओळख हंगामी पिकांकडून आता पेरू पिकासाठी होऊ लागली आहे. तालुक्यात अलीकडील वर्षांत सहाशे एकरपर्यंत त्याचे क्षेत्र पोचले आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक व तेलगंणा राज्याच्या बाजारपेठा मिळविण्याकडे या शेतकऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुका कर्नाटक व तेलंगण राज्याच्या सीमेलगत आहे. काळी कसदार भारी जमीन तालुक्याला लाभली आहे. तालुक्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ८७० मिलिमीटर आहे.  हा तालुका हंगामी पिकांसाठीच मुख्यत्वे प्रसिद्ध आहे. खरिपात उडीद, सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर तर रब्बीमध्ये हरभरा, गहू, करडई, रब्बी ज्वारी आदी पिके असतात. वारंवार पडणारा दुष्काळ तसेच काहीवेळा अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पारंपरिक पिकातून अपेक्षित उत्पादन मिळत नाही. शेतीतून निश्चित स्वरूपाचे व शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी फळबाग लागवड हा चांगला पर्याय अनेक ठिकाणी पुढे आला आहे. याचा बोध घेऊन तालुक्यातील उच्चशिक्षीत तरुण शेतकरी पुढे आले. त्यांनी बाजारपेठा, अर्थकारण, एकरी उत्पादन, खर्च व मेहनत या सर्व बाबींचा अभ्यास करून पेरूची निवड केली. सहाशे एकरांवर लागवड विशेष म्हणजे तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी पेरू पिकाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी एम. के. सोनटक्के, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. तालुक्यात जून २०१८ पासून पेरू लागवडीला सुरवात झाली. आजमितीला तालुक्यात सहाशे एकरांपर्यंत लागवड क्षेत्र असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. यात आणखी वाढ होत आहे. सोबतच सीताफळ, लिंबू, पपई लागवडीकडेही शेतकरी वळले आहेत.   बाजारपेठा मिळवण्याचा प्रयत्न  महाराष्ट्रासह कर्नाटक व तेलंगण राज्ये नजीक असल्याचा फायदा देगलुरच्या शेतकऱ्यांना होत आहे. नांदेड, हैदराबाद, निजामाबाद या मोठ्या शहरात सध्या पेरू पाठवला जात आहे. काही शेतकरी थेट ग्राहकांनाही विक्री करीत आहेत. त्यांना प्रति किलो ८० ते १०० रुपये दर मिळाला आहे. काही शेतकऱ्यांचा पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्याचा प्रयत्न आहे. सध्या मात्र पेरूची आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाली आहे. पहिल्या टप्प्यात  तसेच दिवाळीत चांगला दर मिळाल्याचे शेतकरी सांगतात. यावर्षी अतिवृष्टी होऊनही शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळाले.  तंत्रज्ञानाचा वापर 

  • बहुतांश शेतकऱ्यांकडून मोठ्या आकाराच्या जंबो पेरूची निवड 
  • रोपे बारामती भागातून घेतली आहेत.. 
  •  फळबागेला सूक्ष्मसिंचनाचा वापर 
  • वर्षातून दोन बहर घेतात. पहिल्या बहराची काढणी ऑक्‍टोबर ते डिसेंबर दरम्यान, तर दुसऱ्या बहराची काढणी मार्च ते एप्रिल दरम्यान होते. 
  •  प्रत्येक झाडाची विरळणी करून मर्यादित फळे धरली जातात. 
  •  प्रत्येक फळाला फोम लावला जातो. त्यामुळे तीव्र उन्हापासून संरक्षण होते. फळमाशीचा प्रादुर्भाव रोखला जातो. फळांचा आकारही चांगला होतो. 
  •  काढणीनंतर प्रतवारी केली जाते. वीस किलोच्या बॉक्‍समध्ये पॅकिंग करून पेरू मार्केटला पाठविला जातो. 
  • बागेच्या सुरुवातीच्या काळात आंतरपीक घेता येते.
  • लागवडीसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची मदत मिळाली आहे. ‘पोकरा’मधूनही ठिबक सिंचनाची व्यवस्था आहे.
  • जाधव यांचा अनुभव  कुशावाडी येथील माधवराव जाधव यांनी डिसेंबर २०१८ मध्ये ५० गुंठ्यात पेरूची लागवड केली. मार्च २०२० च्या हंगामात त्यांना शंभर क्विंटल उत्पादन तर किलोला ३० ते ३५ रुपये दर मिळाला. सध्या दुसरा तोडा सुरू आहे. एप्रिल २०१९ मध्ये पुन्हा ६० गुंठ्यात लागवड केली आहे.   अनिल पाटील यांचा प्रातिनिधिक अनुभव 

  • तालुक्यातील रामपूर येथील एमएएमफिल केलेले व सध्या पीएचडी. अंतिम टप्प्यात असलेले अनिल पाटील यांनी माळेगाव (मक्ता) शिवारात दहा एकरांत पेरूची लागवड केली आहे. सन २०१८ मध्ये पाच एकर तर २०१९ मध्ये पाच एकर असे क्षेत्र आहे. ते म्हणाले की आमचा भाग हंगामी पिकांसाठी ओळखला जातो. एकरी नऊ ते दहा क्विंटल उत्पादन एवढीच काय ती त्यातून कमाई व्हायची. आम्ही आमच्या तालुक्याला फळपिकांचा तालुका अशी ओळख देण्याचे ठरवले आहे.  
  • पाटील सांगतात की मला पहिले उत्पादन एकरी ५० क्विंटल तर यंदा दुसऱ्या वर्षांचे उत्पादन १०० क्विंटलपर्यंत आले आहे. तीन बाय दोन मीटर अंतरावरील लागवडीत सुमारे सहाशे झाडे बसतात. मे व ऑक्टोबर अशा दोन टप्प्यांत छाटण्या होतात. ४०० ग्रॅमपासून ते सव्वा किलो वजनापर्यंत फळ घेतो. 
  • किलोला ३० रुपयांपासून ते ६० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. एकरी सव्वा ते दीड लाख रुपयांपर्यंत नफा मिळत आहे. रोपे खर्च, लागवड, सूक्ष्म सिंचन, शेणखत, रासायनिक खत, विविध प्रकारची फवारणी, फोम, बॉक्स, वाहतूक असा एकरी किमान एक लाख रुपये खर्च आला आहे. सध्या दर कमी झाला असला तरी मागील हंगामात चांगले उत्पन्न मिळाले. 
  • पाटील यांनी सीताफळ, पपईसह संत्रा, जांभळाचीही लागवड करण्याचे ठरवले आहे.
  • पेरूची लागवड वाढून बाजारातील आवक वाढल्यास दर पडण्याचा धोका आम्ही लक्षात घेतला आहे. त्या दृष्टीने पुणे, मुंबई, दिल्ली, हरियाना, अहमदाबाद तसेच देशभरातील अन्य ठिकाणच्या बाजारपेठा शोधण्यास सुरुवात केली आहे.     - अनिल पाटील, ९९२३३९७४३४  ( पेरू उत्पादक, रामपूर )

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com