व्यावसायिक पिकांसह संरक्षित शेतीचा आदर्श

बाजारपेठेची मागणी व शेतीचा आर्थिक लेखाजोखा अभ्यासून पिकांची निवड करून व्यावसायिक शेतीचा आदर्श टोनगाव (जि. औरंगाबाद) येथील अप्पासाहेब व लक्ष्मण या आहेर बंधूंनी उभारला आहे. डाळिंब व शेडनेटमध्ये काकडी, ढोबळी मिरची, कारले आदी पिकांचे उत्तम व्यवस्थापन करूनगुणवत्तापूर्ण मालाला त्यांनी बाजारपेठही तयार केली आहे.
आपल्या परिवारातील सदस्यांसह आहेर बंधू .
आपल्या परिवारातील सदस्यांसह आहेर बंधू .

बाजारपेठेची मागणी व शेतीचा आर्थिक लेखाजोखा अभ्यासून पिकांची निवड करून व्यावसायिक शेतीचा आदर्श टोनगाव (जि. औरंगाबाद) येथील अप्पासाहेब व लक्ष्मण या आहेर बंधूंनी उभारला आहे. डाळिंब व शेडनेटमध्ये काकडी, ढोबळी मिरची, कारले आदी पिकांचे उत्तम व्यवस्थापन करून गुणवत्तापूर्ण मालाला त्यांनी बाजारपेठही तयार केली आहे.   औरंगाबाद जिल्ह्यात टोनगाव येथे परशराम व रूख्‌मनबाई या आहेर दांपत्याची शेती आहे. मोठे अप्पासाहेब, क्रमांक दोनचे लक्ष्मण व तिसरे बद्रीनाथ अशी त्यांना तीन मुले आहेत. पैकी बद्रीनाथ औषध कंपनीत नोकरी तर उर्वरित दोघे पूर्णवेळ शेतीची जबाबदारी सांभाळतात. कुटुंबाची वडिलोपार्जित आठ एकर शेती. तीन एकरांत २००७ पासून डाळिंब हे प्रमुख पीक आहे. सन २०१६ मध्ये आहेर बंधूंनी एक एकर क्षेत्रावर शासकीय योजनेचा लाभ न मिळू शकल्याने ‘कमी खर्चिक’ (लो-कॉस्ट ) शेडनेटची उभारणी केली. सन २०१९ मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी अर्थात पोकरा योजनेतून दोन एकरांवरील पक्‍क्‍या, मजबूत शेडनेट उभारणीस आर्थिक लाभ मिळाला. आज एकूण तीन एकरांत त्यांचे शेडनेट उभे आहे. शिवाय हंगामी पिके आहेत. निर्यातक्षम डाळिंब उत्पादन सन २००९-१० पासून डाळिंबाचे समाधानकारक उत्पादन सुरू झाले. सन २०१६-१८ च्या दरम्यान मर आणि तेलकट डाग रोगाचा प्रचंड प्रकोप आला. परंतु त्या परिस्थितीतही व्यवस्थापन नेटके ठेवण्याचा प्रयत्न केले. आज एकरी १० ते १२ टन उत्पादन ते घेतात. उत्पादनातील सातत्य कायम ठेवणाऱ्या आहेर बंधूंना ५० रुपयांपासून ते १०० रुपये प्रति किलोपर्यंतचे दर मिळतात. सर्वाधिक दर ११० रुपये त्यांना २०१४-१५ मध्ये निर्यातक्षम उत्पादनासाठी मिळाला. व्यापाऱ्यांमार्फत परदेशात तसेच नाशिक व प्रसंगी औरंगाबाद मार्केटला विक्री करण्याचे काम आहेर बंधू करतात. एक एकरात मोसंबी सन २०१९ पासून ११ वर्षांसाठी १० एकरांत सुरू केलेल्या करार शेतीत शेततळे व साडेसात एकरात डाळिंब आहे. त्याचबरोबर वडिलोपार्जित शेतीत आधी असलेली मोसंबी काढून त्या ठिकाणी डाळिंब घेतले. करारावरील शेतीत अडीच एकरांत मोसंबी होती. त्यातील दीड एकर क्षेत्र कमी करून त्या ठिकाणी शेततळे घेतले आहे. मोसंबीतून सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. अन्य मुख्य व्यावसायिक पिकांतील खर्च कमी करण्यात हे पीक महत्त्वाची भूमिका निभावते. संरक्षित शेतीतील व्यवस्थापन ‘लो कॉस्ट’ शेडनेटमध्ये सुमारे पाच वर्षांपासून ढोबळी मिरची, काकडी, टोमॅटो, कारले आदी पिके घेत चांगले उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला. ही शेती संरक्षित पद्धतीची असल्याने खुल्या शेतातील पिकांपेक्षा एकरी उत्पादन जास्त मिळते. पूर्वी खुल्या शेतात ढोबळीचे एकरी १५ टन उत्पादन मिळायचे. तेथे शेडनेटमध्ये ते ४० टन व त्यापुढेही मिळू लागले आहे. त्यास १२ ते १५ रुपयांपासून ७०, १०० रुपये प्रति किलोपर्यंतचा दर विविध बाजारपेठांत विक्री केल्यानंतर मिळाला आहे. दीर्घ कालावधीपर्यंत प्लॉट चालत असल्याने हंगामात चांगले पैसे होऊन जातात. काकडीचे उत्पादन राज्यात मागणी असल्याने पांढरी व गुजरातमध्ये मागणी असल्याने लांबट, गोलाकार, हिरवी अशी दोन प्रकारची काकडी आहेर फेरपालट म्हणून दोन्ही शेडनेटमध्ये घेतात. लागवड केल्यापासून ३५ दिवसांपासून सुरू होणारे उत्पादन ९० दिवसांपर्यंत राहते. एकरी सरासरी ४० ते ४५ टन उत्पादन मिळते. त्यास किलोला ८, १० ते १५ रुपयांपर्यंत दर मिळतो. अलीकडेच मध्यस्थांच्या माध्यमातून सर्वाधिक २६ रुपये दर मिळून सुमारे २५ टन हिरव्या काकडीची परदेशात निर्यात झाल्याचे आहेर बंधू सांगतात. शेडनेटमध्ये कारल्याचेही एकरी १५ टनांपर्यंत उत्पादन व किलोला १४ ते १८ रुपयांपर्यंत दर मिळवला आहे. शेतीची वैशिष्ट्ये

  • पूर्वी अप्पासाहेब घरच्या कमजोर आर्थिक परिस्थितीमुळे दुसरीकडे शेतमजुरी करायचे. मात्र आईवडिलांसह घरच्या सर्वांच्या कष्टातून परिस्थिती सुधारल्याचे ते सांगतात.
  • पर्जन्यमान व बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन पिकांची निवड.
  • पुढील दोन वर्षांचे आर्थिक व एकूणच नियोजन करून त्यानुसार कार्यवाही होते.
  • प्रत्येक पिकाचा आर्थिक ताळेबंद व लेखाजोखा मोजून त्यानुसार व्यवस्थापन.
  • आजवरच्या शेती प्रवासात ऊस, मोसंबी, खरबूज, कांदे, टोमॅटो, कारले आदी विविध पिके घेऊन पाहिली. ती घेत असताना पाणी, खते, कीडनाशके, आदी व्यवस्थापनावर होणारा खर्च, मिळणारे दर,
  • अर्थकारण या सर्व बाबी तपासल्या. ऊस व कांदा पिके परवडत नसल्याचे लक्षात आले.
  • शक्यतो बांधावरच विक्री करण्यावर भर असतो. मालाची गुणवत्ता चांगली असल्याने व्यापाऱ्यांकडून उठावही होतो.
  • -दरवर्षी शेणखताचा एकरी सात ते आठ ट्रॉली वापर. उन्हाळ्यात प्रत्येक झाडाला पाचटाचे आच्छादन. त्यासाठीचे बंडल मागवले जाते. दोनहजार लिटर टाकीत जीवामृत स्लरीही तयार केली जाते.
  • -वडिलोपार्जित व करारावरील शेतीत सुमारे पाच विहिरी. सुखना प्रकल्पावरून पाईपलाईनद्वारे पाणी आणले आहे. संपूर्ण क्षेत्र ठिबकखाली. पाण्याच्या कार्यक्षम वापरावर भर.
  • संपर्क- लक्ष्मण आहेर-८९७५६१४२३९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com