
को ल्हापूर जिल्ह्यातील किल्ले भुदरगडच्या पूर्वेस तीन किलोमीटरवर मुरुक्टे (ता. भुदरगड) हे छोटेखानी म्हणजे सुमारे ७६९ लोकसंख्या आणि १२५ कुटुंबसंख्या असलेले गाव आहे. कोल्हापूरच्या पश्चिम भागात पावसाळ्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) असतो. याच पट्ट्यात मुरुक्टे गाव असून, सुमारे ४०० एकर शेतजमीन आहे. भातपीक (Paddy Crop) हाच उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असून नाचणीही (Ragi) असते. प्रत्येक शेतकऱ्याकडे वीस गुंठ्यांपासून चार एकरांपर्यंत शेती आहे. पंधरा ते २० प्रकारच्या भाताच्या पारंपरिक वाणांची इथे लागवड (Paddy Verity) होते. सुधारित वाणही असतातच. आंबेमोहोर, घनसाळ, काळा जिरगा, हावळा आदींसह विविध सुगंधी वाणांची लागवड गावात पाहण्यास मिळते.
भातशेतीचे नियोजन
खरीप हंगामात मुरुक्टे गाव भातशेतीत व्यस्त असते. ऑक्टोबरच्या सुमारास काढणी सुरू झाली, की नोव्हेंबरनंतर व्यापारी व राइस मिल व्यावसायिकांना विक्री सुरू होते. सुगीच्या काळात एक महिना गावात जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची सतत रेलचेल पाहण्यास मिळते. मळणी होईल तसा गावातून दररोज एक टेम्पो भात बाहेरील बाजारपेठेत जातो. दुर्मीळ वाण असल्याने अन्य वाणांपेक्षा दरही चांगले मिळतात.
सुमारे सव्वाशे घरांच्या या छोट्या गावातील शेतकऱ्यांचे भात हेच उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. अरण्याच्या कुशीत गाव असल्याने शुद्ध हवेबरोबरच मातीची प्रतही चांगली राहते. परिणामी, भाताला चवही चांगली येते. गावाला पश्चिम देवस्थान समितीची जमीन आहे. तेथेही उत्पादन घेऊन समितीला काही भाग खंड म्हणून देण्यात येतो. त्यामुळे गावातील प्रत्येक शेतकऱ्याला शेतीचाच आधार आहे.
‘बायोगॅस’साठी अग्रेसर
गाव वसले त्या वेळी पूर्वजांनी सुटसुटीतपणे गावाची रचना केली. अनेक गावांमध्ये एकेरी रस्त्यामुळे दोन वाहनेही जात नाहीत अशी परिस्थिती असते. पण या गावात दोन वाहने सहजपणे एकमेकांना ओलांडून जाऊ शकतील अशी रचना आहे. घरे सुटसुटीत आहेत. या पार्श्वभूमीचा उपयोग गावात जैवइंधन (बायोगॅस युनिट) यंत्रणा उभारणीसाठी झाला.
सन १९९० पासून शासन अनुदानावरील ‘बायोगॅस’ युनिट गावातील ५० टक्के कुटुंबांकडे दिसतात. त्यातून स्वयंपाकासाठीच्या इंधनऊर्जेत बचत झाली आहे. घरटी दोन ते चार जनावरे असल्याने हे शक्य झाले आहे. सुमारे ३२ वर्षांपासून सातत्याने ‘बायोगॅस’ वापरणारे जिल्ह्यातील अग्रेसर गाव म्हणून मुरुक्टेचे नाव आहे. तयार होणाऱ्या स्लरीचा शेतीसाठी वापर होतो.
गावाचा लौकिक
गावात अनेक कडक निर्बंध आहेत. दारूचे एकही दुकान नाही. शंभर टक्के शौचालय वापर आहे. ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होतात. या वेळी केवळ एका जागेसाठी मतदान झाले. गावाला संत तुकाराम वनग्राम पुरस्कार मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हे पहिले निर्मल गाव. राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दूल कलाम यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सदिच्छा भेट दिली आहे. संयुक्त वनव्यवस्थापन योजना राबवण्यात आली आहे. जिल्ह्यातील स्वच्छ सुंदर गाव म्हणून गावाचा सन्मान झाला आहे.
कोरोनामुक्त गाव
दोन वर्षांपूर्वी कोरोनाची सर्वत्र गंभीर समस्या उद्भवली असताना गावात एकही मृत्यू अथवा संसर्ग झालेली व्यक्ती आढळली नाही. अरण्याच्या कुशीत असलेल्या गावाला शुद्ध ऑक्सिजनचा मोठा पुरवठा होतो. शिवाय स्वच्छ पाण्याची सोय आहे. मागील वर्षापर्यंत गावाला जंगलाच्या झऱ्याचे पाणी सायफन पद्धतीने यायचे. आता टाकीत संकलन करून ते पुरवण्यात येते. गेल्या वर्षी गावापासून जवळच बारवे दिंडेवाडी लघू प्रकल्प तयार झाला. त्यामुळे पाण्याची कोणतीही समस्या उरलेली नाही.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.