
Agriculture Success Story सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याची दुष्काळी (Drought) अशी ओळख. ही ओळख आता टेंभूच्या पाण्यामुळे (Tembhu Irrigation) काहीशी पुसली जाऊ लागली आहे. याच तालुक्यातील चिंचाळे गाव. तसं दुष्काळीच. परंतु या गावातून टेंभूचा कालवा गेल्याने शाश्वत पाण्याची (Agriculture Irrigation) सोय झाली.
या गाव शिवारामध्ये डाळिंब बागेसह ऊस लागवडही (Sugarcane Cultivation) वाढत आहे. चिंचाळे गावातील गावातील माणिक गायकवाड यांची वडिलोपार्जित तीन एकर शेती.
परंतु व्यवसायाच्या निमित्ताने गायकवाड कुटुंबीय कर्नाटक राज्यात वास्तव्यास आहेत. तरीदेखील त्यांनी गाव आणि शेतीशी नाळ कधीच तोडली नाही.
महिन्यातून एकदा गावाकडे येऊन आपल्या परिवारासह शेती नियोजनामध्ये वेळ घालवतात. आटपाडी आणि खानापूर तालुक्यातील बहुतांश लोक गलाईचा व्यवसाय करण्यासाठी परराज्यात स्थायिक झाले आहेत.
ऊर्मिला यांचे माहेर खानापूर तालुक्यातील बलवडी (भा.) या ठिकाणी त्यांच्या वडिलांची शेती असल्यामुळे लहानपणापासून त्यांना विविध पिके, पशूपालनाची आवड आहे.
सत्तावीस वर्षापूर्वी ऊर्मिला याचा विवाह माणिक गायकवाड यांच्याशी झाला. गायकवाड यांचा कर्नाटक राज्यात व्यवसाय आहे. परंतु गायकवाड कुटुंबाने गावाकडील शेती विकासामध्ये चांगले लक्ष दिले आहे.
शेती नियोजनाला झाली सुरुवात ः
गावाकडील शेती व्यवस्थापनाबाबत ऊर्मिलाताई म्हणाल्या, की माझ्या माहेरी शेती असल्यामुळे लहानपणापासूनच फळबागेची आवड होती. यातूनच मी सासरच्या शेतीचा विकास करण्याचे मी ठरविले.
माझे दीर गजानन गायकवाड यांची डाळिंबाची बाग पाहून आपणही आपल्या वाट्याची माळ जमीन करू शकतो अशा विश्वास निर्माण झाला. त्यानुसार कुटुंबातील ज्येष्ठ अनुभवी लोकांशी चर्चा करून आम्ही २०१४मध्ये दहा एकर माळ जमीन खरेदी केली.
पुढे आणखी पाच एकर शेत जमीन विकत घेतली. टप्याटप्याने ही जमीन विकसित करण्यास सुरवात केली. पहिल्या टप्यात फळझाडांच्या लागवडीवर भर दिला. कर्नाटकातून नारळ, सुपारी, कोकणातून केसर आंब्याची कलमे आणून तज्ज्ञांच्या सल्याने लागवड केली. बांधावर सागवानाची लागवड केली.
शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी आमच्याकडे विहीर आहे. सध्या दीड एकर केसर आंबा, एक एकर नारळ आणि सहा एकरावर विविध चारा पिकांची लागवड केलेली आहे. दोन वर्षांपासून केसर आंबा आणि नारळाचे उत्पादन सुरू झाले आहे.
आंब्याची विक्री ओळखीच्या ग्राहकांना करतो. गावामध्ये नारळाची विक्री होते. दैनंदिन शेती व्यवस्थापनासाठी आम्ही दोन मजूर जोडपी ठेवलेली आहेत. शेतावरच मजुरांसाठी राहण्याची सोय केलेली आहे.
दर महिन्याला आठ दिवस आम्ही शेतामध्ये असतो. या काळात मजुरांशी चर्चा करून पुढील काळातील नियोजन केले जाते. इतर दिवशी गोठ्यातील मजुरांशी दररोज फोनवरून संपर्क करून नियोजन केले जाते.
शेती विकसित करताना आम्ही परिसरातील अनुभवी प्रयोगशील शेतकरी, कृषी तज्ज्ञांचा सातत्याने सल्ला घेतो.त्यांच्या शेतीला भेट देतो. त्यानुसार आमच्या शेतीमधील पीक व्यवस्थापनामध्ये बदल करत असतो.
हळूहळू आमच्या शेतीचे योग्य नियोजन झाले आहे. शेती मशागतीसाठी ट्रॅक्टर, नांगर तसेच चारा कुट्टी यंत्राची खरेदी झाली. शेती आणि पशुपालनाचे आर्थिक गणित मांडून व्यवसायाची दिशा स्पष्ट केली आहे.
म्हैसपालनास सुरुवात ः
सन २०१६ मध्ये ऊर्मिला ताईंना त्यांच्या वडिलांनी शेतावर एक म्हैस सांभाळण्यासाठी दिली. त्यातूनच पुढे पशुपालन व्यवसायाची सुरुवात झाली. याबाबत ऊर्मिला ताई म्हणाल्या, की आम्ही टप्प्याटप्प्याने पाच म्हशी विकत घेतल्या.
त्यांच्या व्यवस्थापनासाठी एक मजूर जोडपे ठेवले. म्हशींसाठी गोठा देखील बांधला. हळूहळू म्हशींच्या संख्येत वाढ होत गेली. परंतु अपेक्षित दूध उत्पादन मिळत नव्हते.
त्यामुळे प्रयोगशील पशुपालकांशी चर्चा करताना पंढरपुरी तसेच मुऱ्हा म्हशींच्या संगोपनाची माहिती मिळत गेली. त्यानंतर आम्ही हरियाना राज्यात दहा दिवस फिरून नऊ दुधाळ मुऱ्हा म्हशी आणि एक रेडा खरेदी केला.
आम्ही परिसरातील प्रयोगशील पशुपालकांचा सल्ला घेत म्हशींच्या दैनंदिन व्यवस्थापनासह चारा, आरोग्य व्यवस्थापनातील बारीकसारीक गोष्टींचा अभ्यास केला. तसेच पशुपालनात कोणते नवं तंत्रज्ञान आले आहे, याची माहिती मिळविली.
दुग्ध व्यवसायातील बारकावे आणि इतर गोष्टी लक्षात आल्याने वर्षभर दूध उत्पादनात सातत्य राहाण्यासाठी आणखी दहा मुऱ्हा म्हशी टप्प्याटप्प्याने गोठ्यामध्ये आणल्या.
म्हशींच्या दैनंदिन आहारात वर्षभर पुरेसा हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी सहा एकरांमध्ये नेपिअर, कडवळ आणि मका पिकाची लागवड केलेली आहे.
सध्या पशुखाद्याच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे खाद्य आणि वैरण विकत घेऊन पशुपालन परवडत नाही. तसेच दर्जेदार खाद्य, मुरघासाची पुरेशी उपलब्धता होत नाही. त्यामुळे स्वतः पशुखाद्य निर्मिती करण्यावर भर दिला आहे.
तसेच स्वतःच्या शेतात मका लागवड करून त्यापासून मुरघास निर्मितीसाठी यंत्रणा शेतावर उपलब्ध आहे. बाजारातून योग्य कालावधीमध्ये गहू, मका, बाजरीची खरेदी केली जाते. म्हशींना दररोज बाजरी, गहू, मका यांचा भरडा करून दिला जातो.
मंगळवेढा येथून दर हंगामात दहा हजार पेंढी वैरण खरेदी केली जाते. सध्या म्हशींच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी एक कायम स्वरूपी जोडपे ठेवलेले आहे.
म्हशींचे व्यवस्थापन ः
१) ४० बाय १२० फूट आकाराचा सुधारित पद्धतीचा बंदिस्त गोठा.
२) एक एकरावर मुक्त संचार गोठा. रेडकांसाठी स्वतंत्र मुक्त संचार गोठा.
३) जातिवंत पैदाशीवर भर. वेळोवेळी आरोग्य तपासणी आणि औषधोपचारावर भर.
४) म्हशींना पाण्यामध्ये डुंबण्यासाठी ३५ फूट बाय ५० फूट आकाराची टाकी.
५) पहाटे चार वाजल्यापासून गोठ्यातील कामांना सुरुवात.
६) गोठ्याची स्वच्छता झाल्यानंतर म्हशींना चारा दिला जातो. दूध काढले जाते.
७) दूध काढल्यानंतर सकाळी साडेआठ ते दुपारी साडेचारपर्यंत म्हशींना मुक्त संचार गोठ्यात सोडले जाते.
८) सर्व म्हशींना इअर टॅगिंग. त्यामुळे वेत, दूध यासह आरोग्य विषयक बाबींची नोंद ठेवण्यास मदत.
९) गोठ्यामध्ये मॅटचा वापर केल्याने म्हशींचा इजा होत नाही.
१०) थंडीच्या दिवसांत गोठ्याच्या चारही बाजूने शेडनेट लावले जाते.
११) उन्हाळ्यात गोठ्यातील तापमान नियंत्रित करण्यासाठी फॉगरचा वापर.
उत्पादन आणि विक्री ः
१) सध्या १२ म्हशींपासून प्रति दिन १२५ लिटर दूध संकलन.
२) दूध संघास थेट विक्री. प्रति लिटर सरासरी ५८ ते ६० रुपये दर.
३) दरवर्षी साधारण ३० ट्रॉली शेणखताची उपलब्धता. हे शेणखत स्वतःच्या शेतीमध्ये वापरले जाते.
संपर्क ः सौ. ऊर्मिला गायकवाड, ९६२०४०२५२५
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.