
Maharashtra Budget Session 2023 मुंबई : राज्य अर्थसंकल्पात (Budget) विरोधी पक्षांना पंचामृत, शिंदे गटाला प्रसाद आणि भाजपला महाप्रसाद वाटण्यात आला आहे.
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून गोरगरिबांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, हा अर्थसंकल्प म्हणजे ‘बोलाची कढी अन् बोलाचा भात’ आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.
अर्थसंकल्पावरील चर्चेच्या भाषणात विरोधी पक्षनेते पवार म्हणाले, की या अर्थसंकल्पात सरकारने महागाई रोखण्यासाठी उपाययोजना केलेली नाही. विमान इंधनात सवलत दिली, मात्र शेतकऱ्यांना वीजबिल माफी दिली नाही.
सरकारने मागील अर्थसंकल्पातील निधी खर्च न करता केवळ राजकीय आकसापोटी स्थगिती देण्यात धन्यता मानली, त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास रखडल्याचा आरोपही त्यांनी केला.
पवार म्हणाले, की फडणवीस यांनी गृह, अन्न आणि नागरी पुरवठा, गृहनिर्माण यांसारख्या खात्यांसाठी केलेल्या तरतुदीमध्ये कपात केली आहे.
महत्त्वाच्या ६ खात्यांसाठी केलेल्या तरतुदींमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी वाढ केल्याचा दावा त्यांनी केला.
या अर्थसंकल्पात सरकारने शिवसेनेकडच्या खात्यांसाठी ३४ टक्के, तर त्याच्या दुप्पट म्हणजे ६६ टक्के तरतूद भाजपाकडच्या खात्यांसाठी केली. राज्याच्या दरडोई उत्पन्नात, सेवा क्षेत्रात विकासदरात घट झाली आहे.
गेल्या वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीत सरकार अपयशी ठरले आहे. गेल्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदींपैकी केवळ ५२ टक्के आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या केवळ ३३ टक्के रक्कम खर्च झाला आहे.
सध्याच्या सरकारचे सत्ता टिकवणे हेच एकमेव ध्येय आहे. हे सरकार विरोधी आमदारांच्या कामांना स्थगिती देणे आणि देवदर्शन यातच गुंग आहे.
शेतीसाठी १ लाख ४४ हजार २४४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मग मागेल त्याला शेततळे कसे देणार? ही घोषणा फसवी वाटते, असेही ते म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.