
Agriculture Department पुणे ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (Employment Guarantee Scheme) राज्यात फळबाग लागवडीत (Orchard Plantation) उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कृषी आयुक्त सुनील चव्हाण (Sunil Chavan) व फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते (Dr. Kailas Mote) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
राज्यात रोहयो कामकाजात २०२०-२१ व २०२२-२३ या वर्षात वैशिष्ट्यपूर्ण कामे केल्याबद्दल ६१ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.
रोहयो विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार यांनी पुरस्कारार्थींची यादी नुकतीच घोषित केली. शुक्रवारी (ता. ३) मुंबईच्या यशवंतराव चव्हाण केंद्रात होणाऱ्या एका विशेष सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
रोहयोच्या व विविध विभागांचे अभिसरण करून राज्यात ‘सुविधा संपन्न कुटुंब अभियान’ राबविले जाणार आहे.
तसेच सर्वांगीण ग्रामसमृद्धी योजनादेखील सुरू होत आहे. या दोन्ही उपक्रमांचा प्रारंभ आज होतो आहे. मनरेगाची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्राने देशात नेहमीच आघाडी घेतली आहे.
तसेच कृषी विभागाने या योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत नेण्यात इतर राज्यांच्या तुलनेत चांगले यश मिळवले आहे. कृषी विभागाने रोहयोतून १.६८ लाख कामे हाती घेतली होती. त्यापैकी १.५४ लाख कामे वैयक्तिक फळबाग लागवडीची होती.
२०२०-२१ मध्ये अंदाजे ५९ हजार तर २०२१-२२ मध्ये ५६ हजार तर चालू वर्षात ३८ हजार शेतकऱ्यांना रोहयोतून फळबागा उभारल्या आहेत.
तसेच फळबागांवर ४२९ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च केला आहे. त्यामुळेच कृषी विभागाला पारितोषिक देण्यात आले, असे रोहयोच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
रोहयोचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार यांनी राज्याच्या रोहयो आयुक्तांना पाठवलेल्या एका पत्रात नमूद केले आहे, की ‘‘कृषी विभागाने केवळ फळबागा लागवडीला प्रोत्साहन दिलेले नसून, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनेक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळाली आहे.
फळबागांमुळे या शेतकऱ्यांकडे समृद्धी येण्यास मदत झाली आहे. त्याकरिता झालेल्या पाठपुराव्याचे श्रेय कृषी आयुक्त व फलोत्पादन संचालकांना जाते.’’
राज्यात फळबाग लागवडीला चालना देण्यासाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांपासून ते आयुक्तालयातील अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी मेहनत घेतली आहे. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून सांघिक शक्तीचा आहे. यापुढेही आम्ही सर्व जण शेतकऱ्यांसाठी तडफेने काम करीत राहू.
- सुनील चव्हाण, कृषी आयुक्त
सामान्य शेतकऱ्याच्या शिवारात फळबाग उभी राहण्यासाठी आमचे कर्मचारी सतत धडपड करीत असतात. त्यामुळे देशात सर्वांत विक्रमी लागवड महाराष्ट्राची झाली. कृषी कर्मचाऱ्यांची चिकाटी आणि समूह पद्धतीने होत असलेल्या कामकाजामुळे हा पुरस्कार मिळाला आहे.
- डॉ. कैलास मोते, फलोत्पादन संचालक
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.