
Sharad Pawar Latest News ‘‘साखरेच्या विक्रीदरात (Sugar Rate) वाढ नाही. कांद्याचे दर पडले आहेत. ब्राझील, थायलंडमध्ये दुष्काळ आहे. तिकडून साखरेची मोठी मागणी आहे. पण निर्यात केली जात नाही. साखरेची निर्यात केली, तर आपल्या शेतकऱ्याला चार पैसे मिळतील.
पण केंद्र सरकारने साखर निर्यात (Sugar Export) करायची नाही, असा निर्णय घेतला आहे. अशा अकार्यक्षम आणि शेतीसंबंधी आस्था नसलेल्या सरकारचा निकाल लावण्याची वेळ आली आहे,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी रविवारी (ता. ७) केंद्र सरकारला फटकारले.
पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायोसीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन श्री. पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार रोहित पवार, बबनराव शिंदे, संजय शिंदे, यशवंत माने, संदीप क्षीरसागर, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, व्हाइस चेअरमन प्रेमलता रोंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, ‘‘आमच्या सरकारच्या काळात २००४ मध्ये गहू, तांदूळ उत्पादनात देशाने आघाडी घेतली होती. त्या वेळी आपण गव्हाची किंमत २०० रुपयांनी वाढविली, तर खताच्या किमती कमी केल्या.
त्यानंतर पुढे २०१४ मध्ये जगभरातील १८ देशांना गहू पुरवठा करणारा देश म्हणून भारताचा दुसरा क्रमांक राहिला. तांदूळ आणि दूध उत्पादनातही भारताने आघाडी घेतली. केवळ शेतकऱ्यांना त्यांच्या घामाची किंमत दिल्याचा हा परिणाम राहिला. पण आजचे सरकार धोरण स्वीकारायला तयार नाही.’’
‘‘गरज असताना काही धान्याची आयात केली जाते. सध्या साखरेच्या निर्यातीत मोठी संधी आहे. ब्राझील, थायलंडमध्ये साखरेचा दर प्रतिक्विंटल ५२०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
पण सरकारला निर्यात करायची नाही, हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे का’’, असा प्रश्न पवार यांनी केला. ‘‘एकेकाळी सोलापूर जिल्हा दुष्काळी होता.
पण (स्व.) यशवंतराव चव्हाण यांनी उजनी धरणाचा पाया घातला आणि त्यातील पाण्याच्या बळावर आज जिल्ह्यातील ऊस, फळबागेची शेती फुलली आहे,’’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
अभिजित पाटील यांनी कारखान्याचे गाळप आणि आगामी उपक्रमांची माहिती दिली. ‘‘सरकारने एमआयडीसी सुरू करावी. त्यासाठी कारखान्याची २५० एक जमीन आम्ही देऊ’’, असेही त्यांनी सांगितले.
अभिजित पाटील ‘राष्ट्रवादी’त
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी अधिकृतरीत्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ‘‘तुम्ही संपूर्ण ताकदीने अभिजित यांच्या पाठीशी उभे राहा. मी तुम्हाला एवढेच सांगतो, की ज्या वेळी निवडणूक येईल,
त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा, आमच्या सहकाऱ्यांचा, महाविकास आघाडीचा लोकप्रिय उमेदवार कोण आहे, असा प्रश्न विचारला, तर लोक अभिजितचे नाव घेतील, यासंबंधीची तयारी तुम्ही सुरू करा,’’ अशा शब्दांत शरद पवार यांनी पंढरपूर-मंगळवेढ्यातून पाटील यांची उमदेवारीच एकप्रकारे जाहीर केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.