
अनिल जाधव
पुणेः ऑक्टोबरमध्ये दबावात असलेले कापसाचे दर (Cotton Rate) नोव्हेंबरमध्ये वाढले. मात्र शेतकऱ्यांना आणखी दरवाढीची अपेक्षा होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विकला नाही. परिणामी आतापर्यंत देशातील कापूस आवक (Cotton Arrival) गेल्यावर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी घटली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
भारताचा कापूस हंगाम १ ऑक्टोबरला सुरु होतो. मात्र यंदा महत्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये लागवडीच्या काळात योग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे लागवडीला उशीर झाला. त्यातच नोव्हेंबर महिन्यात अनेक भागांमध्ये सलग १५ ते २० दिवस पाऊस पडला. त्यामुळे कापूस बाजारात दाखल होण्यास उशीर झाला. त्यात ऑक्टोबर महिन्यात कापसाचे दर दबावात आले होते. सरासरी दर ६ हजार रुपयांपर्यंत घसरला होता. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते.
मात्र नोव्हेंबरमध्ये उद्योगाकडून कापसाला उठाव मिळाला. परिणामी दरात सुधारणा झाली होती. कापसाला सरासरी ८ हजार ८०० ते ९ हजार ७०० रुपयांपर्यंत वाढला होता. मात्र डिसेंबर उजाडला तसे कापसाचे दर नरमले. त्यासाठी देशातील तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील काही घटक कारणीभूत होते. दर वाढल्याने शेतकऱ्यांना कापसाचा भाव १० हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोचेल अशी आशा होती. मात्र कापसाचा हा दर जास्त दिवस टिकला नाही.
डिसेंबर महिन्यात कापूस दर नरमले आहेत. सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ४०० ते ८ हजार ९०० रुपये दर मिळत आहे. बाजारात कापसाचे दर नरमल्यानंतर शेतकऱ्यांनी मात्र बाजारातील आवक कमी केली. बाजार मागील १५ दिवसांपासून दबावात आहे. तरीही बाजारातील आवक घटलेलीच आहे.
देशातील बाजारात १ ऑक्टोबरपासून ७ डिसेंबरपर्यंत ४९ लाख ६७ हजार गाठी कापसाची आवक झाली. गेल्यावर्षीपेक्षा ही आवक जवळपास ४० टक्क्याने कमी होती. मागीलवर्षी याच काळातील आवक ८२ लाख २१ हजार गाठींवर होती. उत्तर भारतातील आवक १८ लाख गाठींवरून १३ लाक गाठींपर्यंत कमी झाली. तर मध्य भारतातील आवक ४६ लाख गाठींवरून २६ लाख गाठींवर स्थिरावली.
राज्यातील शेतकऱ्यांना
रोखला कापूस
महाराष्ट्रातील बाजारातील आवक जवळपास ७६ टक्क्यांनी कमी झाली. गेल्या हंगामात राज्यातील बाजारात १८ लाख गाठी कापूस आवक झाली होती. तर यंदा केवळ ६ लाख २७ हजार गाठी कापूस शेतकऱ्यांनी विकला. त्यामुळे यंदा राज्यातील कापूस दरही टिकून आहेत. तसेच पंजाबमधील आवकही ७५ टक्क्यांनी घटली आहे. गेल्या हंगामात २ लाख ७५ हजार गाठी कापूस बाजारात आला होता. मात्र यंदा केवळ ७० हजारांवर आवक स्थिरावला.
………….
शेतकऱ्यांमुळे टिकला बाजार
बाजारातील आवक कमी असल्याने कापूस दरात जास्त घसरण झाली नाही, असे जाणकारांनी सांगितले. शेतकऱ्यांनी कापसाचे पॅनिक सेलिंग केले असते तर बाजारात दरात जास्त घसरण पाहायला मिळली असती. पण तसे झाले नाही. चालू महिन्यात कापूस दरात चढ उतार कायम राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली. तर पुढील महिन्यात कापसाच्या दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला होता.
उद्योगाची मागणी
दुसरीकडे काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने कापूस आयातीवरील आयात शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. सध्या शेतकऱ्यांकडे कापसाचा साठा आहे. त्यामुळे सरकार आयातशुल्क रद्द करण्याचा निर्णय घेणार नाही, असाही अंदाज काहीजण व्यक्त करत आहेत. मात्र सरकारने असा निर्णय घेतला तरी दर टिकून राहतील आणि आंतरराष्ट्रीय बाजारासोबत बदलतील, असा अंदाजही जाणकारांनी व्यक्त केला.
--
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.