
Nashik News एप्रिलच्या पहिल्या सप्ताहापासून वादळी पावसाची सुरुवात झाली. मात्र अजूनही हा पाऊस थांबत नसल्याची स्थिती आहे. प्रामुख्याने द्राक्ष पिकानंतर आता उन्हाळ कांदा काढणीच्या (Onion Harvesting) अंतिम टप्प्यात नुकसान (Crop Damage) वाढते आहे.
गुरुवारी (ता.४) दुपारनंतर मालेगाव, देवळा, येवला, सटाणा, इगतपुरी तालुक्यांत पावसाने दाणादाण उडविली आहे. त्यामध्ये उन्हाळ कांदा पिकासह टोमॅटो, मिरचीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी आता हतबल झाला आहे.
मालेगाव तालुक्यात दोन तास झालेल्या जोरदार पावसाने शहरातील सखल भागात पाणी साचले. नागरिक व व्यावसायिकांची धावपळ उडाली. पाऊस सुरु झाल्यानंतर लगेचच वीजपुरवठा बंद झाला.
ग्रामीण भागातही आघार, ढवळेश्वर, टेहरे, दाभाडी, तळवाडे परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. उघड्यावर झाकलेला तसेच चाळीमध्ये साठविलेला कांदा भिजला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. डाळिंबासह आंबा, शेवगा व भाजीपाला पिकांनाही याचा फटका बसला.
देवळा तालुक्यात वाखारी, भिलवाड, रामेश्वर, कणकपूर, शेरी परिसरात अनेक शिवारात पाणी साचले. कांदा शिवारात भिजला.
त्याची साठवणूक सुरू असताना शेतकऱ्यांची धावपळ उडाली. येवला तालुक्यातही शहरासह पश्चिम पट्ट्यात पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यामुळे कांद्याचे नुकसान झाले.
अंतिम टप्प्यातील गहू, हरभरा पिके उघड्यावरच असल्याने शेतकऱ्यांची ते झाकण्यासाठी धावपळ झाली. सटाणा तालुक्याच्या उत्तर भागात पावसाचा फटका बसला.
पश्चिम पट्ट्यात मोठा फटका
जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात वादळी पावसाने मोठी दाणादाण उडाली. या भागात आंबा लागवडी मोठ्या प्रमाणावर आहेत. हरसुल परिसरात मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय लग्नकार्यात मंडप उडून गेले. पावसामुळे लग्नात विघ्न आल्याचे नागरिकांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.