दानापूर, जि. अकोला ः तेल्हारा तालुक्यात दानापूर परिसरात गेल्या दोन दिवसाअगोदर मध्यरात्री पुन्हा जोरदार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावल्यामुळे शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन (Soybean Harvest) तसेच वेचणीस आलेला बागायती कापूस (Cotton Picking) भिजला असून, शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून नेते काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
या भागात गेले काही दिवस पावसाने उघड दिल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन कापणीला सुरुवात केली होती. मात्र गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने दानापूर, सोगोडा, बोरखेड, हिंगणी, सौंदळा, वारखेड, रायखेड, कोठा, बेलखेड आदी भागांत सोंगून ठेवलेले सोयाबीन ओले झाले. तसेच काही शेतकऱ्यांनी सोयाबीनचा ढीग ताडपत्रीने शेतातच झाकून ठेवला होता.
सतत तीन वर्षांपासून नैसर्गिक संकटाला शेतकरी कंटाळला असून, कधी ओला दुष्काळ तर कधी कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. दानापूर परिसरात या वर्षी ओल्या दुष्काळामुळे सोयाबीन पीक फुलधारणा अवस्थेत असताना बुरशीजन्य रोगामुळे संकटात सापडले होते. फूलगळ झाल्याने सोयाबीनचे एकरी उत्पादन दीड ते दोन क्विंटलवर आले. तसेच कपाशीची बोंड काळसर झाल्यामुळे उत्पादनात हमखास घट दिसत आहे.
ओला झालेला कापूस पिवळसर होत आहे. यामुळे दरांवर परिणाम होऊ शकतो. आणखी काही दिवस पाऊस राहिल्यास शेतकऱ्यांचे शेतात राहिलेले सोयाबीन, कापूस मातीत जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.