
Pune Weather Update : राज्यावरील वादळी पावसाचे सावट अद्यापही कायम आहे. सकाळपासून उन्हाचा चटका, उकाडा आणि दुपारनंतर वादळी पाऊस असे चित्र राज्याच्या विविध भागांत दिसत आहे.
रविवारी (ता. १७) पुणे, सातारा, आणि नाशिक जिल्ह्यांत वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीने पुन्हा तडाखा दिला आहे. अनेक ठिकाणी गारांचा (Hailstorm) अक्षरशः खच पडल्याचे दिसून आले.
पुणे जिल्ह्यात वादळी पावसाचा दणका सुरूच असल्याने गहू, हरभरा, कांदा व भाजीपाला पिकांच्या नुकसानीत वाढ होत आहे. गारांच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. रविवारी (ता. १६) हवेली, भोर, आंबेगाव, शिरूर, पुणे शहरातील उपनगर या भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. जोरदार वाऱ्यामुळे फळबागांचे नुकसान झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रविवारी पावसासह हलकिशी गारपीट झाल्याने पुन्हा एकदा दिंडोरी तालुक्यातील पूर्व, तर सिन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना तडाखा दिला आहे.
द्राक्ष बागा व कांद्याच्या शेतांमधून पाणी शिवारातून वाहिले. गारपिटीने द्राक्ष बागांना मोठा फटका बसला असून, उन्हाळ कांदा, गहू, कांदा बियाणे (डोंगळे), हरभरा व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.
सातारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारपीट व पाऊस झाला आहे. महाबळेश्वर, वाई, खंडाळा, माण तालुक्यांत काही ठिकाणी वादळी वारे, गारपिटीसह जोरदार पाऊस झाला आहे.
डाळिंब, टोमॅटो, मका, केळी, आंबा, घास, भेंडी, कांदा, गवार, ऊस आदी उन्हाळी पिकांना या गारपिटीने अक्षरशः झोडपल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. पाडळी व बोरी येथे तर गारांचा मोठा पाऊस झाला. शेतात व डोंगर परिसरात गारांचा खच पडला. ग्रामीण भागातील स्ट्रॉबेरी शेतात गारांचा खच पडल्याने हे पीक संपले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.