
Water Conclave Pune ः अग्नी, जल, वायू, आकाश आणि पृथ्वी या पंचमहाभूतांमुळे (Panchamahabhut) जीवसृष्टी टिकून आहे. विश्वाच्या वाटचालीत पंचमहाभूते एकमेकांमध्ये सतत सलोखा ठेवत उत्क्रांत होत आहेत.
मात्र मानव त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करीत असून ते टाळायला हवे, असे मत विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले (Dr. Purushottam Rajimwale) यांनी व्यक्त केले.
‘नद्यांचे पुनरुज्जीवन आणि जल व्यवस्थापन’ या विषयावरील जल महापरिषदेत (वॉटर कॉनक्लेव्ह) ते बोलत होते. डॉ. राजीमवाले यांनी अग्निहोत्राचे प्रात्यक्षिक व पूजन केले. तसेच या विधीचे जल व्यवस्थापनातील महत्त्व विषद केले.
या वेळी ‘द सत्संग फाउंडेशन’चे संस्थापक व आध्यात्मिक गुरू श्री एम., जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह, ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक व ‘एपी ग्लोबाले’चे चेअरमन अभिजित पवार व्यासपीठावर होते.
पंचमहाभूतामधील जल तत्त्वाचे महत्त्व वैदिक तत्त्वज्ञानाने अधोरेखित केले आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीच्या सर्व टप्प्यांवर जलविषयक पावित्र्य ठिकठिकाणी विशद केले आहे. शिवाच्या जटांमधून निघालेली गंगा हे त्यापैकीच एक प्रतीक आहे.
पंचमहाभूते ही आपल्या तत्त्वज्ञानाबरोबरच आधात्माचीही मूलतत्त्वे आहेत. एकमेकांशी सलोखा ठेवत पंचमहाभूते उत्क्रांत होत असताना त्यात मानव अडथळे आणतो आहे. ते टाळायला हवे. त्यासाठी आपण निसर्गचक्र काळजीपूर्वक जपले पाहिजे, असे ते म्हणाले.
‘‘आपले निसर्गचक्र आरोग्यदायी पद्धतीने यज्ञ टिकवून ठेवत असल्याचे भगवत गीतेत सांगितले आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीत राजेमहाराजे यज्ञ करीत होते. यज्ञामुळे मनःशांती लाभत असल्याचे शास्त्रीय अभ्यासातून सिद्ध झाले आहे.
यज्ञ केल्यानंतर वातावरणातील ऑक्सिजन वाढतो व कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण घटत असल्याचे आढळले आहे. अग्निहोत्र भस्म मिसळल्याने पाण्याची गुणवत्ता सुधारते.
त्यातील जडधातूचे प्रमाण घटते व विषाक्ततादेखील कमी होते,’’ असा दावा डॉ. राजीमवाले यांनी केला.
कृषी व्यवस्थेत अग्निहोत्र हवे
‘‘पाण्याची क्षारता व आम्लता नियंत्रित आणण्यासाठी अग्निहोत्र भस्म उपयुक्त ठरते. अग्निहोत्राचा समावेश कृषी व्यवस्थेतदेखील हवे. जगभर ६० देशांत सध्या अग्निहोत्र शिकवले जाते.
नद्यांच्या काठावर अग्निहोत्र विधी व्हावेत व त्याचे भस्म नद्यांमध्ये मिसळावे. जैविक शेतीत अग्निहोत्राचा वापर व्हावा. शाश्वत व निरामय राहणीसाठी शहरांमध्ये अग्निहोत्र केले जावेत,’’ अशा अपेक्षा डॉ. राजीमवाले यांनी व्यक्त केल्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.