
Nagar News नगर ः बदलती जीवनशैली, आहाराचा परिणाम (Diet), लक्षणांकडे दुर्लक्ष व व्यायामाचा अभाव, यामुळे शहरासह ग्रामीण भागातही मूत्रपिंडाचे आजार (Kidney Disease) झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
अलीकडच्या पंधरा वर्षांत हे प्रमाण अधिक आहे. मूत्रपिंड रोपण केले जात असले, तरी डायलिसिसवर असलेल्या सुमारे एक लाखापेक्षा अधिक रुग्णांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची (Kidney Transplant) प्रतीक्षा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मानवाच्या शरीरातील मूत्रपिंड हा महत्त्वाचा भाग आहे. साधारण पंचवीस वर्षांपूर्वी शहरी भागातील लोकांत मूत्रपिंडाच्या आजाराचे प्रमाण ग्रामीण भागाच्या तुलनेत अल्प होते. किडनी तज्ज्ञांच्या मतानुसार दहा ते पंधरा वर्षांपासून ग्रामीण भागात, शेतकरी, मजूर, कामगारांतही मूत्रपिंडाचे आजार होण्याचे प्रमाण वाढत असून, सध्या तीन ते चार टक्के लोक मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त आहेत.
मधुमेह, उच्चरक्तदाब, मुतखडा, वाढते वजन यामुळे मूत्रपिंडाचा आजार होण्याचे संभव असतात. काही प्रमाणात हा आजार आनुवंशिक असतो. बदलती जीवनशैली, आहाराचा परिणाम, लक्षणांकडे दुर्लक्ष व व्यायामाचा अभाव यामुळे मूत्रपिंडाचा आजार होण्याचे प्रमाण अधिक असून, आता त्यात ग्रामीण भागही मागे नसल्याचे दिसून येत आहे. सध्या मूत्रपिंडाच्या आजाराची साधारण सहा ते सात टक्के लोकांना सौम्य लक्षणे दिसतात. मूत्रपिंडाची तपासणी करण्याचे प्रमाणही पंचवीस टक्के आहे.
सध्या राज्यात एक लाखापेक्षा अधिक, तर देशात दहा लाखांपेक्षा अधिक लोकांना मूत्रपिंडाचा गंभीर आजार असून, ते डायलिसिस करतात. हे लोक मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहे.
मात्र सध्याचा विचार करता दात्यांचे प्रमाण पाहता किमान दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार असल्याची स्थिती आहे, असे तज्ज्ञ सांगतात.
मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरांत होणारी मूत्रपिंड प्रत्यारोपण सुविधा नगर येथे विखे पाटील फाउंडेशनच्या रुग्णालयात उपलब्ध असून, आतापर्यंत सहा शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
दात्यांची संख्या अल्प
किडनीदान (मूत्रपिंड) करण्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळत असली, तरी सध्याच्या स्थितीत मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांची संख्या पाहता दात्यांची संख्या एक टक्काही नाही.
एखाद्या व्यक्तीचा मेंदू मृत असेल, तर त्या व्यक्तीचे अन्य अवयव दान केले जाते. मात्र इतर देशांच्या तुलनेत भारतात हे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अवयव दानाबाबत जनजागृती असणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
आहार, बदलती जीवनशैली, व्यायाम न करणे आदी कारणाने मूत्रपिंडाचे आजार वाढत आहेत. डायलिसिस करत असलेले रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यास तयार असले, तरी दात्यांची संख्या अल्प असल्याने किमान दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार असल्याची सध्याची स्थिती आहे. नगरसारख्या भागातही आता मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्याची सुविधा कमी किमतीत उपलब्ध झाली आहे.
- डॉ. साईप्रसाद शिंदे, किडनी विकारतज्ज्ञ, नगर
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.