
नगर ः देश अन्नधान्यांमध्ये स्वयंपूर्ण (Self Sufficient In Food Grain) झाला. जगात ज्या वेळी दुष्काळ (Drought) पडतो, त्या वेळी इतर देश भारताकडे अन्नधान्यासाठी बघतात. भारतात कृषिक्षेत्र (Agriculture Sector) महत्त्वाचे आहे. या क्षेत्रात आपण पदवी घेतली आहे याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीचे आरोग्य खालावले असून, ते सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतांचा (Organic Fertilizer) जास्तीत जास्त वापर करावा.
भरडधान्य हे गरिबांचे धान्य म्हणून गणले जायचे पण त्याच्यामधील पौष्टिकता लक्षात घेता या भरडधान्यांना आता जगात मान्यता मिळाली असून त्याचा आहारामध्ये जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी करावा, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३६ व्या पदवीदान समारंभ कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी यांनी कार्यक्रमात ऑनलाइन मार्गदर्शन केले.
या प्रसंगी कृषिमंत्री अब्दुल सत्तार, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, नवी दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी आणि राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार चिमणराव पाटील,
दत्तात्रय उगले, डॉ. प्रदीप इंगोले, गणेश शिंदे, संजीव भोर, अधिष्ठाता (कृषी) डॉ. उत्तम चव्हाण, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, कुलसचिव प्रमोद लहाळे, नियंत्रक डॉ. बापुसाहेब भाकरे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार आणि विद्या शाखेच्या उपकुलसचिव श्रीमती आशा पाडवी उपस्थित होते.
या वेळी कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील विद्यापीठ अहवाल सादर करताना म्हणाले, की विद्यापीठ विविध विषयांमध्ये पदविका, कृषी पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य पदव्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देते. विद्यापीठाने कास्ट प्रकल्पाच्या माध्यमातून ड्रोन तंत्रज्ञान याचबरोबर देशी गायीवरील संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे.
गेल्या वर्षी विद्यापीठाने विविध पिकांचे सहा वाण, चार कृषी यंत्रे व अवजारे आणि एकूण ७० तंत्रज्ञान शिफारशी विकसित करून शेतकऱ्यांसाठी प्रसारित केलेल्या आहेत. तसेच विस्तार शिक्षण क्षेत्रात विद्यापीठाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.
पदवीदान समारंभात सन २०२१-२२ मध्ये बी.एस्सी (कृषी) पदवीत प्रथम आलेली कु. अपूर्वा वामन, बी.एस्सी (उद्यान विद्या) मध्ये प्रथम आलेली कु. सिद्धम्मा हलोली, कृषी अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेली कु. शालिनी आभाळे यांना सुवर्णपदक व इतर यशस्वी विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली.
डॉ. मायी, पवार यांना मानद पदवी
कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या हस्ते कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी आणि राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी कृषी क्षेत्रासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ या मानद पदवीने सन्मानित केले. तसेच या वेळी ६२ विद्यार्थ्यांना पीएच.डी., ३८२ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व ६,३८८ विद्यार्थ्यांना पदवी असे एकूण ६,८३२ पदव्या प्रदान करण्यात आल्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.