
Nashik News : जिल्ह्यातील वाजगाव (ता. देवळा) येथील बाळासाहेब देवरे व त्यांच्या भावडांनी आई-वडिलांच्या कष्टाची प्रेरणा घेत प्रयोगशील शेती व देशी गोवंश संवर्धनाचा वसा जपला आहे.
यामध्ये सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करत जमिनीची सुपीकता वाढविण्यासह ७० एकर क्षेत्रावर फलोत्पादनाचे आदर्श मॉडेल उभारले आहे.
हेच बलस्थान ओळखून त्यांच्या घरातील अंजना केवळ देवरे व पद्मा बाळासाहेब देवरे यांनी पुढाकार घेत शिवपर्व कृषी पर्यटन केंद्राची सुरुवात करून नव्या संधीची गुढी उभारली आहे. त्यातूनच कृषिपूरक व्यवसायाच्या माध्यमातून नवा अध्याय निर्माण केला आहे.
१९९० पासून सालापासून द्राक्ष, डाळिंबाचे उत्पादन घेत कुटुंबाने अभ्यासूवृत्तीने सुरुवात केली. तर गेल्या तीन दशकांत आधुनिक संकल्पनांची सांगड घालून जवळपास विविध फळे, मसाला पिके व त्यांच्या विविध वाणांची लागवड करून उत्पादन ते घेत आहेत.
एखाद्या कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्र फिके पडेल असे त्यांचे उत्कृष्ट शेती नियोजन आहे. यासह १०० हून अधिक देशी गोवंश संवर्धन येथे केले जाते. त्यांचे शेतीप्रयोग पाहण्यासाठी आजवर १० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आजवर भेटी दिल्या होत्या.
हीच बाजू ओळखून त्यांच्या घरातील महिलांनी विविध ठिकाणी भेटी देऊन कृषी पर्यटनाचा अभ्यास केला. त्यातूनच उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे कृषी पर्यटन केंद्र अल्पावधीतच नावारूपास आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व सृष्टी सौंदर्य लाभलेल्या वाजगाव (ता. देवळा) येथील शिवशी मळ्यात हे केंद्र उभे राहिले आहे. येथे फलोत्पादनात वैविध्य तर आहे.
यामुळे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला निसर्गाच्या सानिध्यात शेतीचे प्रयोग नवनव्या संकल्पना ज्यामध्ये सिंचन, पीक संरक्षण, जलसंधारण, कृषी यांत्रिकीकरण, देशी गोवंश संवर्धन, सेंद्रिय शेती, किमान खर्चात एकात्मिक पीक व्यवस्थापन असे अनेक प्रयोग अनुभवता येतात.
निसर्गसंपन्न, ऐतिहासिक परिसरात उभारणी
कृषी पर्यटन केंद्राच्या परिसरात धोडप किल्ला, छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक कांचनमंचन लढाईचे ठिकाण, राजधेर, मार्केण्ड गड तसेच साल्हेर-चौल्हेर असे अनेक गडकिल्ले आहेत.
तर सप्तश्रृंगी गड, रेणुकादेवी, मांगीतूंगी अशी स्थळे असल्याने त्यांच्याकडे पर्यटकांचा ओघ वाढता आहे. शहरी भागातून येणाऱ्या पर्यटकांना निसर्गासह समृद्धशेतीची भुरळ पडते तर शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या पर्यटकांना येथे आदर्श पद्धतीने शेती व्यवस्थापन अनुभवता येते.
चालूवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी केंद्राची सुरुवात झाल्यानंतर १५०हून अधिक सहली येथे भेटीसाठी आल्या तर २,५०० पर्यटकांनी भेटी देऊन कृषी पर्यटनाचा आनंद येथे लुटला आहे.
कृषी पर्यटन केंद्र दृष्टिक्षेपात:
- पर्यटन संचालनालयाकडून मान्यता प्राप्त
- नारळ, द्राक्ष, आंबा, डाळिंब, सीताफळ, पेरू, चिकू, जांभूळ यांची लागवड तर सफरचंद, अंजीर, लीची, स्टार फ्रूट, चेरी, फणस, संत्री, मोसंबी, ड्रॅगनफ्रूट, अव्हाकॅडो या फळपिकांच्या प्रायोगिक तत्त्वावर लागवडी.
- अद्रक, सुपारी, दालचिनी, लवंग, तेजपान या मसाले पिकांच्या प्रायोगिक लागवडी
- सहाव्या वेळेस यशस्वी उसाचा खोडवा उत्पादन प्रयोग
- सेंद्रिय शेतीसाठी १००हून अधिक देशी गायींचे संगोपन शास्त्रीय पद्धतीने कंपोष्ट खत निर्मितीसह वापर
- गायींसाठी ३ एकर क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने विविध चारापिके
- मत्स्यपालन व मधूकक्षिकापालन प्रत्यक्ष मार्गदर्शन
- शेती पाहण्यासाठी मनोरे, शिवारात भटकंती करण्यासाठी बैलगाडीची सफर यासह बोट रायडिंग, धबधबा, रेनडान्स
- निवासव्यवस्था तसेच चुलीवरच्या महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांची मेजवानी
- लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या खेळण्या
- थेट बांधावर उत्पादित फळांची विक्री
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.