
Nagpur News : देशाचे लागवड क्षेत्र अधिक असले तरी कापसाची हेक्टरी उत्पादकता मात्र सर्वात कमी आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्पादकतेत वाढीसाठी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने उथळ आणि हलक्या जमिनीसाठी सघन कपाशी लागवड प्रणालीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय.जी. प्रसाद यांनी केले.
केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत आयोजित खरीप लागवडपूर्व प्रशिक्षण आणि शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. प्रसाद म्हणाले, की मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी तंत्रशुद्ध व्यवस्थापन गरजेचे आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी प्रयत्नांवर भर द्यावा. पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन हे यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
कापसाच्या हेक्टरी उत्पादकता वाढीचे सद्यःस्थितीत मोठे आव्हान आहे. त्या आव्हानाचा सामना करण्यात सघन कापूस लागवडीचे मोठे योगदान राहणार आहे. अनुसूचित जाती विकास कृती आराखडा अंतर्गत आयोजित केलेल्या या कार्यक्रमात डॉ. जयंत मेश्राम यांनी उपक्रमांचा आढावा सादर केला.
आगामी पीक हंगामात सर्वोत्तम पध्दतीचा अवलंब करण्यासाठी सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बॅटरीवर चालणारे नॅपसॅक स्प्रेअर, भाजीपाला बियाणे कीट, कीड व्यवस्थापन किट, विद्राव्य खते, भाजीपाला बियाणे किट यांचे वितरण करण्यात आले.
केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच माजी संचालक डॉ. सी.डी. मायी यांनी देखील या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. कपाशीची गुणवत्ता सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी व्यवस्थापनावर लक्ष्य दिले पाहिजे. त्यासोबतच वेचणीच्यावेळी कापसात अधिक काडी कचरा येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.