
Pune Crop Damage : पुणे जिल्ह्यात मार्च २०२३ मध्ये दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीत (Heavy Rainfall) जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील ४०८.९४ हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले आहे.
या अतिवृष्टीचा जिल्ह्यातील एक हजार ४३४ शेतकऱ्यांच्या पिकांचे किमान ३३ टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान झाले आहे. मात्र, राज्य सरकारने शेती पिकांसाठी गेल्यावर्षी निश्चित केलेल्या नुकसान भरपाईच्या रकमेत मोठी कपात केली आहे.
यासाठी प्रतिहेक्टरी संवर्गनिहाय दिल्या जाणाऱ्या भरपाईच्या रकमा कमी झाल्या आहेत. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना मिळून आता केवळ ७० लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळू शकणार आहे.
जिल्हा प्रशासनाने याबाबतचा अहवाल तयार केला असून, राज्य सरकारकडे भरपाईसाठीच्या रकमेची मागणी केली आहे. या अहवालात दिलेल्या आकडेवारीनुसार आठ तालुक्यातील १ हजार ४३४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रचलित पद्धतीनुसार जिरायती, बागायती आणि फळपिके अशा तीन संवर्गानुसार प्रति हेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते.
जिरायती पिकांसाठी सर्वात कमी, त्यानंतर बागायती पिकांसाठी थोडी जास्त आणि फळपिकांसाठी या दोन्हींपेक्षा अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्यात येते.
जून २०२२ पूर्वी जिरायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी सहा हजार आठशे, बागायती पिकांसाठी १३ हजार ५०० आणि फळबागांसाठी १८ हजार रुपायांची नुकसान भरपाई मिळत असे.
यासाठी किमान क्षेत्राची मर्यादा नव्हती. परंतु, कमाल दोन हेक्टर मर्यादेपर्यंतच ही रक्कम दिली जात असे. या रकमांमध्ये गेल्यावर्षी दुपटीने वाढ केली होती.
शिवाय नुकसान झालेल्या क्षेत्राची मर्यादा दोन हेक्टरवरून तीन हेक्टर केली होती. परंतु, ही नवीन वाढ केवळ जून ते आॅक्टोबर २०२२ या केवळ पाच महिन्यांपुरतीच होती, असे राज्य सरकारने याबाबत नव्याने निश्चित केलेल्या रकमांवरून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, राज्य सरकारने शेती पिकांच्या नुकसान भरपाईच्या प्रतिहेक्टरी रकमांमध्ये आता पुन्हा कपात केली आहे. त्यानुसार नव्याने निश्चित केलेल्या रकमांबाबतचा अध्यादेश २७ मार्च २०२३ रोजी काढला आहे.
या अध्यादेशानुसार जिरायती पिकांसाठी आता प्रतिहेक्टरी आठ हजार ५०० रुपये, बागायतींसाठी १७ हजार आणि फळपिकांसाठी २२ हजार ५०० रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नुकसान भरपाईचे नवे दर प्रतिहेक्टरी (रुपयांत)
जिरायती पिके- ८ हजार ५००
बागायती पिके- १७ हजार
फळपिके- २२ हजार ५००
कमीत कमी भरपाई
जिरायती पिके- १ हजार
बागायती पिके- २ हजार
फळपिके- २ हजार ५००
जिल्ह्यातील नुकसान दृष्टीक्षेपात
बाधित तालुक्यांची संख्या- ०८
बाधित तालुक्यांची नावे- जुन्नर, शिरूर, खेड, आंबेगाव, पुरंदर, हवेली, मावळ व मुळशी
बाधित गावांची संख्या- ८४
पिकांचे नुकसान झालेले शेतकरी- १४३४
नुकसान झालेले क्षेत्र- ४०८.९४ हेक्टर
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.