
परभणी : कृषी पंपाच्या वीजपुरवठा (Agricultural Electricity) प्रश्नी शिवसेनेतर्फे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) परभणी येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर गुरुवारी (ता. १) आंदोलन करण्यात आले. या वेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून वीजपुरवठा सुरळीत चालू ठेवावा, अशी मागणी करण्यात आली.
जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांसाठी धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे. परंतु विजेअभावी शेतकरी पिकांना पाणी देऊ शकत नाहीत. धरणातून सोडलेल्या या पाण्याचा शेतकऱ्यांना काहीच उपयोग होत नाही. ग्रामीण भागात १२ ते १६ तास वीज भारनियमन केले जत आहे. ट्रान्स्फॉर्मर (डीपी) जळाल्यानंतर ते लवकर मिळत नाहीत.
नवीन डीपी व विजेचे साहित्यही वेळेवर मिळत नाही. डीपी वितरण विभागातील लाइनमन व इंजिनिअर मागील अनेक वर्षांपासून एकाच पदावर ठाण मांडून असलेले अधिकारी व कर्मचारी मनमानी कारभार करत आहेत. नवीन जोडणीसाठी शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. त्यात गेल्या काही दिवसांपासून वीजबिल वसुलीच्या नावाखाली सध्या वीजजोड तोडण्याचा सपाटाच महावितरणने लावला आहे.
एकंदरीत महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. शिवसेनेतर्फे करण्यात आलेल्या आंदोलनात जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, गंगाप्रसाद आणेराव, सदाशिव देशमुख, संजय गाडगे आदींसह कार्यकर्त, शेतकरी सहभागी झाले होते.
...यांच्या बदल्या करा
वीजबिल वसुलीच्या नावाखाली सुरू असलेली वीज तोडणी मोहीम तत्काळ थांबवावी. तोडलेले कनेक्शन लवकरात लवकर जोडून द्यावेत. भारनियमन बंद करावे. कृषी पंपासाठी वेळेवर आणि मुबलक वीजपुरवठा करावा. अनेक वर्षांपासून एकाच पदावर ठाण मांडून बसलेल्या इंजिनिअर व लाइनमनच्या बदल्या कराव्यात, डीपी जळाल्यानंतर ते ताबडतोब दुरुस्त करून द्यावेत, या मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.