
Yavatmal News : शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून शासनाने यावर्षीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात अल्पकालीन व दीर्घकालीन योजनांचा समावेश असून विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आणि गावात समृद्धी यावी यासाठी शासन काम करीत असल्याचे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड (Minister Sanjay Rathod) यांनी केले.
आत्मा प्रकल्प कार्यालय, कृषी विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त आयोजित यवतमाळ जिल्हा कृषी महोत्सव २०२३ चे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थित समता मैदान येथे पार पडले.
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. उंदीरवाडे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार, डॉ. एन. डी. पार्लावार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, विद्या शितोळे, क्रांती काटोले, सदस्य रेणुताई शिंदे उपस्थित होते.
यावर्षी पहिल्यांदाच राज्यात ७०० कोटी रुपये तर जिल्ह्यात ५१ कोटी रुपयांची नुकसान भरपाई शासनाने दिली आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने धान्य योजनेमध्ये समाविष्ट केले होते.
आता त्याऐवजी वार्षिक प्रतिव्यक्ती १८०० रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असेही संजय राठोड यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, अभिनव प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचे आपण एक रिसोर्स बँक तयार केलेली आहे.
त्याचबरोबर नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती संपन्न करणाऱ्या शेतक-यांचा शेतकरी शास्त्रज्ञ मंच स्थापन केलेला आहे. यामध्ये जवळपास १०० च्या आसपास शेतकऱ्यांचा समावेश आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.