
Mango Season सिंधुदुर्गनगरी ः पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मोहर (Mango Blossom) येऊन फळधारणा झालेल्या हापूस आंबा (Hapus Mango) पिकाला सध्या वाढत्या तापमानाचा फटका बसत आहे. त्यातच तिसऱ्या टप्प्यातील आलेल्या मोहरापासून आंबा उत्पादन (Mango Production) अडचणीत येण्याची शक्यता आहे.
हे उत्पादन मे अखेर किंवा जूनमध्ये येण्याचा अंदाज आहे. त्या वेळी पावसामुळे नुकसान होण्याची जास्त शक्यता असल्याने बागायतदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.
जिल्ह्याच्या अर्थकारणात महत्त्वपूर्ण असलेल्या आंब्याचा या वर्षीचा हंगाम काहीसा संकटात आहे. या वर्षी पहिल्या टप्प्यात १५ ते २० टक्के, दुसऱ्या टप्प्यात २५ टक्के, तर तिसऱ्या टप्प्यात ५० ते ६० टक्के मोहर आला.
पहिल्या टप्प्यातील मोहर नोव्हेंबर, डिसेंबर, दुसऱ्या टप्प्यातील मोहर जानेवारी, तर तिसऱ्या टप्प्यात मोहर फेब्रुवारी महिन्यात आला. पहिल्या टप्प्यातील आंबा पुढील २० ते २२ दिवसांत काढणीला येईल.
काही भागांत काढणीला सुरुवात देखील झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंबा मार्च अखेरपर्यंत येईल. परंतु फळधारणा झालेल्या आंब्याला सध्या वाढत्या तापमानाचा फटका बसत आहे. अनेक भागांत उन्हामुळे आंब्यावर काळे डाग पडत आहेत.
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यातील तापमान ३९ अंशांपर्यंत राहिले आहे. आठ दिवस ३९ अंशांपर्यंत तापमान राहिल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील आंबा पिकांचे नुकसान होत असताना आता तिसऱ्या टप्प्यातील आंबा तयार होण्यास किमान ९० ते १०५ दिवसांचा कालावधी लागतो.
त्यामुळे आंबा मेअखेर किंवा जूनमध्ये तयार होण्याची शक्यता आहे. या कालावधीत पावसाने आंब्याच्या नुकसानीची शक्यता आहे.
तापमानवाढीने आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु मार्चपूर्वी तापमानवाढीपासून झालेल्या आंबा पीक नुकसानीस विमा संरक्षण नाही. १ मार्चनंतर पीक संरक्षण आहे. त्यामुळे शासनाने या पीकविमा योजना राबविताना सद्यःस्थितीच्या नुकसानीचा आढावा घेऊन योजना कार्यान्वित करावी.
- सुशांत नाईक, आंबा बागायतदार, वेतोरे
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील तापमान ३९ अंश सेल्सिअस होते. गेल्या तीन, चार वर्षांचा आढावा घेतला असता फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात ३८ अंशांपर्यंत तापमान राहिलेले आहे.
- डॉ. अभिषेक मुठाळ, तांत्रिक अधिकारी, मुळदे संशोधन केंद्र
तापमानवाढीचा आंब्यावर परिणाम झाला आहे. परंतु तिसऱ्या टप्प्यातील आंबा परिपक्व व्हायला १०५ दिवस लागतील, असे म्हणता येणार नाही. तापमानवाढीमुळे आंबा लवकर तयार होईल. मात्र तरीही १५ मे उजाडेल, असा अंदाज आहे.
- डॉ. विजय दामोदर, शास्त्रज्ञ, रामेश्वर संशोधन उपकेंद्र, देवगड
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.