
Nagar Onion News : यंदाच्या खरिपामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्याची मोठे नुकसान केलेले असताना आता असताना आता कांद्याने डोळ्यात पाणी आणले आहे. गेल्या दीड वर्षापासून कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत नाही.
सोमवारी (ता. २७) नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत (Nagar Agricultural Produce Market Committee) झालेल्या लिलावात कांद्याला कमीत कमी १ रुपये, तर जास्तीत जास्त प्रति किलो १० रुपये दर मिळाला. कांद्याला दर (onion Bajarbhav) मिळत नसताना यंदा क्षेत्रवाढ मात्र मोठ्या प्रमाणात झाली असून कांदा लागवड केलेले शेतकऱ्यांचे मात्र आता ‘टेन्शन’ वाढले आहे.
नगर जिल्ह्यात वर्षभरात साधारण एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार हेक्टरपर्यंत कांदा लागवड व्हायची. गेल्या दोन वर्षांपासून खरीप, लेट खरीप आणि रब्बीत कांदा लागवडीत क्षेत्र झपाट्याने वाढले आहे.
यंदा केवळ रब्बीमध्ये एक लाख ८० हजार हेक्टर कांदा लागवड झाली असून अजूनही काही ठिकाणी लागवडी सुरूच आहेत. गेल्या दीड वर्षापासून कांद्याला फारसा दर नाही. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यातील पंधरा दिवसांचा कालावधी वगळता कांद्याला जास्तीत जास्त दीड हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक दर मिळाला नाही.
यंदा तर कांद्याचा दर त्याहूनही खाली आला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून नगरसह जिल्ह्यातील विविध बाजार समितीत कांद्याचा दर जास्तीत जास्त प्रति किलो १२ रुपयांपेक्षा अधिक नाही. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची सर्वाधिक आवक होत असते.
सोमवारी (ता. २७) ७० ते ८० हजार गोण्यांपर्यंत बाजारात आवक झाली. जास्तीत जास्त प्रति किलो १० रुपये दर मिळत असला तरी कमीत कमी १ रुपये प्रति किलोचा नीचांकी दर मिळाला.
कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली खरी, परंतु कांद्याला दरवाढ मिळेल की नाही याचे टेन्शन नव्याने कांदा लागवड केलेल्या शेतकऱ्यांना आले आहे.
शेतातच कांदा करताहेत नष्ट
कांद्यावर आतापर्यंत केलेला खर्च सोडता काढणीचा खर्चही त्यातून निघणार नसल्याची खात्री झाल्यानंतर अनेक शेतकरी कांद्याचे पीक शेतातच नष्ट करू लागले आहेत. कर्जत तालुक्यातील नागापूर तसेच संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्याने कांद्याचे पीक शेतातच नष्ट केल्याचे प्रकार घडले.
एकरी ६५ हजारांचा खर्च
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च जास्त येत असून, उत्पन्न मात्र कमी मिळत आहे. कांद्याला एकरी ६० ते ६५ हजार रुपये उत्पादन खर्च लागतो. यात बियाणे १० हजार, लागवड ८-१० हजार, निंदणी ५ हजार, फवारणी ८ हजार, रासायनिक खते १० हजार, काढणी काटणी १० हजार, भराई मजुरी २ हजार, वाहतूक खर्च ३ हजार असा एकूण ६० ते ६५ हजार खर्च येतो.
मात्र सध्या मिळणारा भाव पाहता शेतकऱ्याच्या हातात केवळ ३० हजार रुपये येतात. त्यामुळे एकरी शेतकऱ्यांना २५ हजार रुपये तोटा सहन करावा लागत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.