
Crop Damage : वादळी पाऊस व गारपीटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे राज्यातील नुकसानग्रस्त भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) पाहणी करणार आहेत.
शनिवार (ता.२५) व रविवार (ता.२६) या दोन दिवशी मुख्यमंत्री धुळे आणि हिंगोली जिल्ह्याच्या पाहणी दौरावर जाणार आहेत. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी करणार असल्याने शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे.
मागील दोन आठवड्यात वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास हिसकवला. रब्बीतील गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, फळपिके तसेच भाजीपालाचे नुकसान झाले.
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाचा फटका अधिक बसला आहे. सध्या कृषिमंत्री सत्तार राज्याच्या विविध भागात पाहणी करत आहेत. आता मुख्यमंत्रीही पाहणी करणार आहेत.
सध्या सुरू असलेल्या राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी आग्रही मागणी विरोधी पक्षाने केली.
परंतु मुख्यमंत्र्यांनी पंचनाम्याचे आदेश दिल्याचे सांगून पंचनाम्यानंतर मदत जाहीर करू, असे सांगत शेतकऱ्यांची बोळवण केली, अशी नाराजी शेतकरी व्यक्त करत आहेत.
"२५ मार्चपर्यंत पंचनामे पूर्ण होतील. त्यानंतर सरकार मदतीचा निर्णय घेईल," असे कृषिमंत्री सत्तारांनी सांगितले. ते उत्तर महाराष्ट्राच्या पाहणी दौरावर होते.
दरम्यान, राज्य अर्थसंकल्प अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकरी प्रश्नावर विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. २५ मार्च रोजी राज्य अर्थसंकल्प अधिवेशन संपणार आहे.
निसर्गाच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार तातडीने मदत करेल की, पुनः शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जाणार, याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.