
Akola News : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Produce Market Committee) सोमवारी (ता. २०) हरभरा व तुरीची आवक वाढल्याने शेतीमाल विक्रीसाठी आलेल्यांना माल उतरवता आला नाही.
उशिरापर्यंत माल न उतरवल्याने सायंकाळी शेतकऱ्यांनी एकत्र येत बाजार समितीच्या कार्यालयाबाहेर रोष व्यक्त केल्याचा प्रकार घडला.
स्थिती बिघडू नये यासाठी प्रशासनाने रामदास पेठ पोलिसांचे सहकार्य घेतले. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर शेतकरी शांत झाले.
गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत मालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आता तुरीसोबतच हरभऱ्याची आवकही वाढू लागली. सलग दोन दिवस बाजार समिती बंद राहिल्याने सोमवारी (ता. २०) एकाचवेळी आवक वाढली.
हरभरा व इतर शेतीमाल घेऊन शेतकरी बाजार समितीमध्ये पोहोचले. या वेळी बाजार समितीमध्ये आधीचा शेतीमाल विक्रीसाठी उपलब्ध असल्याने सोमवारी आलेल्या शेतकऱ्यांचा माल दिवसभर गाड्यांमध्ये ठेवावा लागला.
तर दुसरीकडे आधी आलेल्या जवळपास ९ हजार क्विंटल शेतीमालाची खरेदी-विक्री करण्यात आली.
सायंकाळी उशिरापर्यंत प्रतीक्षेत राहिलेल्या शेतकऱ्यांचा माल गाड्यातून न उतरवल्यामुळे सायंकाळी शेतकऱ्यांचा संयम सुटला व त्यांनी बाजार समितीच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त केला. या वेळी स्थिती अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली.
दिवसभर खरेदी केलेला माल उचलल्यानंतर मोकळ्या जागेत नवीन शेतीमाल उतरवून घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर शेतकरी शांत झाले.
बाजार समितीत गेल्या काही दिवसात लिलाव व मोजमाप प्रक्रियेला विलंब होत असल्याने वारंवार अडचणी येत आहेत. यामुळे बाजार समितीला माल स्वीकारण्यासाठी अडचणी येतात. त्याचा परिणाम शेतकऱ्यांचा रोष वाढतो.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.