
Government officer Straick : सरकारी कर्मचारी संपाचा फटका आता शेतकऱ्यांना बसतो आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पंचनामे कर्मचारी संपामुळे करत नाहीत. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे.
या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारला धारेवर धरत सोमवारी (ता.२०) सभात्याग केला. विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच शेतकऱ्यांची परिस्थिती विरोधीपक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) सांगितली. तसेच तातडीने मदतीची मागणी केली.
शेतकरी अस्मानी संकटाने हैराण आहे. वादळी पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. परंतु कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शेतकऱ्याच्या बांदावर जाण्यास कुणी तयार नाही. नुकसानीचे पंचनामे होत नाहीत.
लवकरात लवकर पंचनामे करावेत. तातडीने शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधीपक्षाने विधानसभेत केली.
विरोधीपक्षाच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले,"मी स्वतः पाहणी केली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सरकार कर्मचाऱ्यांना संपावर असले तरीही पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही कर्मचाऱ्याने पंचनामे करायला नकार दिलेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनाही सूचना दिलेल्या आहेत.
त्यामुळे काल आणि आज राज्यात पंचनामे कर्मचारी करत आहेत. शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे हीच आमची भावना आहे. पंचनामे होऊन नुकसानीचे आकडेवारी आल्यानंतर शेतकऱ्यांना मदत जाहीर करू."
"संपातील कर्मचारी शेतकऱ्यांसाठी संप असूनही पंचनामे करण्यासाठी तयार आहेत. परंतु पंचनाम्यावर सही करणार नाहीत, अशी संपकरी कर्मचाऱ्यांची भूमिका आहे.
फक्त पंचनामे करून फायदा नाही. संबंधित सरकारी कर्मचाऱ्यांची पंचनाम्यावर सही करणे, गरजेचे असते. त्यामुळे सरकारने तोडगा काढून हा प्रश्न मिटवावा," अशी मागणी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केली.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जयंत पाटील, धनंजय मुंडे, कॉँग्रेसचे आ. बाळासाहेब थोरात, सुनिल केदार यांनी आक्रमक भूमिक घेत सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
बाळासाहेब थोरात म्हणाले, "गारपीटीने प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. गहू, कांदा, भाजीपाला. द्राक्ष, आंबा, नुकसान झालं आहे. परंतु सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कुणीही पंचनामे करायला तयार नाही.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सभागृहात असते तर चांगलं झालं असतं. आता निर्णय करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना दिलासा रक्कम तरी सरकारने तातडीने पोहचवावी."
"आभाळ फाटलं म्हणून शेतकऱ्यांचे नशीब फाटले आहे. एकूण आठ शेतकऱ्यांना मृत्यू झाला. असंख्य पशुधन गेलं. मागचं अनुदानातला एक रुपयाही मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळाला नाही. सरकार अनुदान जाहीर करतं, पण शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाही," असे आ. धनंजय मुंडे म्हणाले.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचेही शुक्रवारी (ता.१७) सांगितले होते. परंतु सरकारी कर्मचारी संपामुळे पंचनामे होत नाहीत, असे शेतकरी सांगतात.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.