
Mumbai News : राज्यातील नाफेडची हरभरा खरेदी केंद्रे तत्काळ सुरू करण्याच्या सूचना देण्यात येतील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
राज्यातील शेतकरी पाऊस व गारपिठीने हैराण आहे. गारपीठ व पावसाने आपला हरभरा खराब होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांना तो हरभरा खरेदी केंद्रावर विकायचा आहे.
मात्र राज्यात नाफेडद्वारे चालवण्यात येणारी बहुतांश हरभरा खरेदी केंद्रे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. ही केंद्रे त्वरित सुरू करावीत, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत मंगळवारी कामकाजाच्या मुद्द्याद्वारे केली.
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफेडच्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. हरभरा खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. महाएफपीओची काही केंद्रे बंद करण्यात आली आहेत. या केंद्रांच्या तक्रारी होत्या. मात्र, अन्य केंद्रे सुरू आहेत, अशी माहिती दिली.
मुंडे म्हणाले, ‘ हरभरा खरेदी केंद्रे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. नाफेडकडे हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यासाठीचे बरेच प्रस्ताव प्रलंबित आहेत. राज्य सरकारने नाफेडला सांगून सदर प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावून शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करावा.
बीड जिल्ह्यात केवळ पाच हरभरा खरेदी केंद्रे सुरू असल्याचेही धनंजय मुंडे यांनी नमूद केले. तसेच नाफेडकडील प्रलंबित प्रस्ताव तातडीने मान्य करायला लावण्याची भूमिका सरकारने घ्यावी.
फडणवीस यांनी,नाफेडने हरभरा खरेदी केंद्रांना मान्यता दिली आहे, काही हरभरा खरेदी केंद्रांनी मागील वर्षी खरेदीत अनियमितता केल्यामुळे नाफेडकडून प्रस्ताव तपासून घेतले जात आहेत.
तरीही शेतकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून खरेदी केंद्रांचे प्रलंबित प्रस्ताव तत्काळ निकाली काढले जावेत, अशा सूचना नाफेडला करण्यात येतील, असे मुंडे यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.