Green Manuering : जमीन सुपीक करणारी हिरवळीची खते

Indian Agriculture : हिरवळीचे पीक जमिनीत अन्न पुरवठ्याबरोबर तिचे भौतिक व रासायनिक गुणधर्म सुधारण्यास मदत करते. हिरवळीचे खत तयार करण्यासाठी प्रामुख्याने धैंचा, बोरु, शेवरी, बरसीम, सुबाभूळ, गिरीपुष्प, चवळी, मूग लागवड करतात.
Green Manuering
Green ManueringAgrowon

डॉ. पपिता गौरखेडे, डॉ.आनंद गोरे, डॉ.मदन पेंडके

Land Quality : जमिनीचा पोत टिकविणे आणि उत्पादन वाढविण्यासाठी हिरवळीची खते महत्त्वाची आहेत. हिरवळीची पिके फुलोरा येण्यापूर्वी जमिनीत गाडल्यापासून मुख्य अन्नद्रव्ये आणि सेंद्रिय घटकांचा पुरवठा जमिनीस होतो.

१) पीक भिन्न हवामान व जमिनीत चांगले वाढणारे असावे.

२) पीक लवकर वाढणारे एक ते दीड महिन्यात येणारे असावे. पीक गाडून कुजून पुढील पिके घेणे सुलभ होईल.

३) प्रतिकूल परिस्थितीत उदा. दुष्काळात कमी किंवा जास्त तापमानातही तग धरणारे हवे.

४) मुळांवर गाठी तयार करण्याची किंवा नत्र स्थिर करण्याची क्षमता असावी.

५) त्यावर पाला भरपूर, हिरवागार असावा.

६) मुळे जमिनीत खोलवर जाणारी व खोड कोवळे, लुसलुशीत असावे.

७) जमिनीत गाडल्यास झपाट्याने कुजावे.

हिरवळीच्या खताचे प्रकार

१) शेतात लागवड करण्यायोग्य हिरवळीचे खते:

- ज्या शेतात हिरवळीचे खत गाडावयाचे आहे तिथेच हिरवळीचे पीक सलग शेतात पेरले जाते. हे पीक फुलोरा येण्यापूर्वी नांगरणी करून जमिनीत गाडले जाते किंवा मुख्य पिकांसोबत आंतरपिके म्हणून याची वाढ करून ती जमिनीत मिसळले जाते. उदा. बोरू (ताग), धैंचा, मूग, चवळी, मटकी, शेवरी, लसूणघास, बरसीम.

२) हिरवळीचे पीक घेऊन पालापाचोळ्यापासून खत :

- या पद्धतीमध्ये वनस्पतीच्या नाजूक हिरव्या फांद्या व पाने लुसलुशीत कोवळी असतात. अशा झाडांची लागवड बांधावर करून किंवा परिसरातील जंगलातून फांद्या, पाने गोळा करून शेत नांगरणी किंवा विलगीच्या वेळी जमिनीत गाडतात. उदा. गिरीपुष्प, शेवरी, करंज, सुबाभूळ इत्यादी.

Green Manuering
Water Management : सुपीक जमीन, जलसाठे शाश्‍वत करूयात

हिरवळीच्या खतांचे फायदे

१) यामध्ये ह्यूमस असते, त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो.

२) या खतामधील सेंद्रिय द्रव्यांमुळे जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंना अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. परिणामी जिवाणूंची वाढ भरपूर होऊन त्यांची कार्यशक्ती जोमाने वाढते. जमिनीतील पोषक द्रव्ये रासायनिक क्रियेने विरघळून ती पिकांना सुलभ स्थितीत प्राप्त होतात.

३) लवकर कुजणारी हिरवळीची खते वापरल्यामुळे एकूण नत्र, उपलब्ध स्फुरदाचे प्रमाण आणि अझोटोबॅक्टर सारख्या जीवाणूंचे प्रमाण वाढते.

४) जमिनीत टिकून राहणाऱ्या कणसमूहांचे प्रमाण वाढते.

५) जमिनीची जलधारणा क्षमता वाढते. पावसाच्या पाण्यामुळे होणारी जमिनीची धूपही कमी होते.

६) सेंद्रिय पदार्थांमुळे माती रवेदार होण्यास मदत होते. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत साचून न राहता त्याचा निचरा लवकर होतो. हलक्या जमिनीत देखील सेंद्रिय पदार्थांमुळे पाणीधारण करण्याची क्षमता वाढते.

७) द्विदल वर्गातील हिरवळीची पिके ही हवेतील नत्र शोषून घेतात. हे नत्र जमिनीत साठविले जाऊन ते पुढील पिकांना उपलब्ध होते.

८) क्षारपड जमिनीत हिरवळीचे पीक गाडण्यामुळे क्षार कमी होऊन त्या जमिनी लागवडीखाली येतात.

९) ही पिके जमिनीत असेंद्रिय स्फुरदाचे सेंद्रिय स्फुरदात रूपांतर करतात. जमिनीतील स्फुरदाची उपलब्धता वाढवितात.

१०) पिकांच्या दाट वाढीमुळे तणांचे नियंत्रण होण्यास मदत होते.

हिरवळीच्या पिकांचे नियोजन

१) पिकांची निवड: मातीत आद्रता, खतासाठी लागणारा वेळ या गोष्टी लक्षात घेऊन शेंगवर्गीय पिकांची निवड करावी.

२) पेरणीची वेळ : मृगाचा पहिला पाऊस पडल्यावर हिरवळीच्या पिकांची पेरणी करणे योग्य असे मानले जाते. मात्र ही वेळ प्रदेशनिहाय वेगळी असू शकते. पुरेशा आद्रतेमध्ये बियांची उगवण चांगली होते.

३) जमिनीमध्ये गाडण्याची योग्य वेळ: सर्वसाधारणपणे पीक फुलात आल्यावर ती गाडावीत. यासाठी पेरणीनंतर साधारणपणे ६ ते ८ आठवडे लागतात.

४) हिरवळीची पिके गाडल्यानंतर मुख्य पिकांची पेरणी यातील कालावधी : मातीत गाडलेल्या पिकांना कुजवण्यासाठी किती वेळ लागतो, यावर मुख्य पिकांची पेरणी करण्याचे नियोजन करावे. जाडसर, रसाळ देठ व पाने कुजवण्याला कमी वेळ लागतो.

मातीचा पोत व आद्रता ही सुद्धा महत्त्वाची आहे. हलक्या मातीमध्ये योग्य आद्रता असताना हिरवळीचे खत गाडल्यानंतर ७ ते १२ दिवसांनी पेरणी करावी.

५) अन्नद्रव्यांची उपलब्धता : पिकांच्या भरघोस वाढीसाठी लागणारे मुख्य अन्न घटक व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये हिरवळीच्या पिकांच्या कुजण्यातून मातीत उपलब्ध होतात. ही प्रक्रिया मातीच्या रासायनिक, भौतिक, जैविक पातळीवर अवलंबून असते.

हिरवळीच्या खतांचे गुणधर्म :

१) प्रति हेक्टर सुमारे ५० ते १७५ किलो नत्र उपलब्ध होते.

२) जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढतो.

३) मातीची पाणी व अन्नद्रव्ये धरून ठेवण्याची क्षमता वाढते. उपयुक्त सुक्ष्मजीवांचे प्रमाण वाढते.

४) जमिनीची भौतिक स्थिती सुधारते. अन्य मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यास मदत होते.

हिरवळीच्या खतांच्या मर्यादा : लागवडीसाठी क्षेत्र, कालावधी व पाण्याची उपलब्धता आवश्यक असते. बियांचा खर्च वाढतो. आंतरपीक म्हणून घेताना मुख्य पिकांशी स्पर्धा करू शकतात.

हिरवळीच्या खतांची कार्यशक्ती :

सर्वसाधारणपणे १ टन हिरवळीचे किंवा शेंगवर्गीय पिकापासून बनलेले खत हे २.८ ते ३ टन शेणखत किंवा ४.५ ते ४.७ किलो नत्र किंवा १० किलो युरियाच्या बरोबर असते. म्हणजेच २४ ते ३० किलो नत्राचा पुरवठा करण्यासाठी ६ टन हिरवळीचे खत प्रति हेक्टरी वापरावे लागते.

Green Manuering
Galyukta Shiwar Scheme : तलाव गाळमुक्त अन् शेती सुपीक करण्याचे ध्येय

हिरवळीच्या खतांसाठी योग्य असलेली पिके :

१) ताग/बोरू :

- हे हिरवळीचे उत्तम खत आहे. ज्या विभागात पुरेसा पाऊस किंवा सिंचनाच्या पाण्याची हमी असते तेथे तागाचे पीक घेण्यात यावे.

- सर्व प्रकारच्या जमिनीत या पिकाची वाढ चांगली होत असली तरी आम्लधर्मीय जमिनीत याची वाढ जोमाने होत नाही. तसेच पाणी साचून राहणाऱ्या शेतात तागाची चांगली वाढ होत नाही.

- पावसाळ्याच्या सुरवातीस हेक्टरी ५० ते ६० किलो तागाचे बी पेरावे. पेरणीनंतर ५ ते ६ आठवड्यांनी हे पीक फुलो­ऱ्यावर येण्याच्या सुमारास नांगराच्या साहाय्याने जमिनीत गाडून टाकावे.

- तागामध्ये नत्राचे प्रमाण ०.४६ टक्के आहे. हेक्टरी ८० ते ९० किलो नत्र मिळते.

२) धैंचा :

- तागापेक्षा काटक असे हिरवळीचे हे पीक असून कमी पर्जन्यमान, पाणथळ ठिकाण, क्षारमय अथवा आम्लधर्मीय जमिनीत सुद्धा हे पीक तग धरू शकते.या वनस्पतीच्या मुळांवर तसेच खोडावरही गाठी दिसून येतात या गाठीमध्ये रायझोबियम जीवाणू सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेने हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात.

- लागवडीसाठी हेक्टरी २५ ते ४० किलो बियाणे पावसाळ्याच्या सुरूवातीस शेतात पेरावे. पेरणीपूर्वी रायझोबियम जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया बियाण्यास करावी.

- पिकाच्या वाढीसाठी आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करून पीक ६ ते ७ आठवड्यात ९० ते १०० सेंमी उंचीपर्यंत वाढले असता जमिनीत नांगराने गाडून टाकावे. या काळात धैंच्यापासून १० ते २० टनापर्यंत हिरव्या सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होते.

- या वनस्पतीत नत्राचे शेकडा प्रमाण ०.४६ टक्के इतके आहे. भात लावणी करण्यापूर्वी आठ दिवस पीक जमिनीत गाडल्यास हेक्टरी ८० किलो नत्राची उपलब्धता होऊ शकते.

३) घेवडा :

- हे पीक कमी पर्जन्यमान व हलक्या प्रतीच्या जमिनीत चांगले वाढते. पाणथळ जमिनीस हे पीक योग्य नाही.

- पावसाळ्याच्या सुरवातीला प्रती हेक्टरी ५० किलो बियाणे पेरावे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात ते जमिनीत गाडावे.

४) द्विदल कडधान्याची पिके :

- पावसाळ्याच्या सुरूवातीस शेत तयार करून मूग, चवळी, उडीद, गवार यांचे बियाणे शेतात पेरले असता या द्विदल वर्गीय पिकांचा हिरवळीच्या खताशी चांगला उपयोग होतो. जमिनीची पूर्व मशागत केल्यावर मूग, उडीद, कुळीथ यांचे प्रति हेक्टरी २५ ते ३० किलो बियाणे पेरावे.

- पेरणीपूर्वी बियाण्यास रायझोबियम जीवाणू संवर्धक चोळून आवश्यकतेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पीक फुलो­ऱ्यावर येण्यापूर्वी नांगरणी करून जमिनीत गाडले असता यापासून प्रति हेक्टरी ५० ते ६० किलो नत्र पिकास उपलब्ध होते.

५) गिरीपुष्प (ग्लिरिसिडिया) :

- झुडुप वर्गातील हे पीक कोणत्याही प्रकारच्या जमिनीत, निरनिराळ्या पर्जन्यमानाच्या प्रदेशात चांगले येते.

- छाट कलमाद्वारे लागवड करण्यासाठी ३० सेंमी लांब आणि ३ सेंमी व्यासाची दोन छाट कलमे निवडून पावसाळ्याच्या सुरूवातीस ३० बाय ३० बाय ३० सेंमी आकाराचा खड्डा करून बांधावर किंवा पडीक जमिनीत लागवड करावी.

- गादी वाफे तयार करून किंवा प्लॅस्टीकच्या पिशवीत बी पेरून रोपे तयार करावे. ही रोपे पाच आठवड्यांची झाल्यावर पावसाच्या सुरूवातीस शेताच्या बांधावर खड्डे खोदून लावावीत. पहिल्या वर्षी उन्हाळ्यात रोपांना पाणी देणे आवश्यक असून दुस­या वर्षापासून पुढे प्रत्येक छाटणीला २५ ते ३० किलो हिरवा चारा मिळू शकतो.

- या झाडाच्या फांद्याची वरचेवर छाटणी करून या झाडांना नवीन फूट येते. त्यांच्या हिरव्या पालवीपासून हिरवळीचे उत्तम खत मिळते.

- गिरीपुष्पाची पाने धैंचा, वनझाडाच्या पालापाचोळ्यापेक्षा जलद कुजतात.

- गिरीपुष्पाच्या पानांमध्ये सेंद्रिय कर्ब ३६ टक्के, नत्र २.७० टक्के, स्फुरद ०.५ टक्के, पालाश १.१५ टक्के आहे. नत्रयुक्त खतांच्या खर्चात बचत होते.

हिरवळीचे खत वापरायची पद्धत

- आपल्याला ज्या शेतात हिरवळीचे खत द्यायचे आहे, त्यामध्ये हिरवळीच्या पिकाची मे-जून महिन्यात पेरणी करावी किंवा बियाणे फेकून द्यावे. बियाणाचे प्रमाणे दीडपट जास्त वापरावे. जेणेकरून पीक दाट येईल.

- हिरवळीच्या पिकात हेक्टरी २० ते २५ किलो नत्र स्थिरीकरणाची प्रक्रिया जोमाने होते. अशा प्रकारे लावलेल्या पिकांची पर्णीय वाढ झाल्यावर फुलो­ऱ्यात येण्याआधी म्हणजे पेरणीपासून ६ ते ८ आठवड्यांसाठी ते पीक नांगरून जमिनीत गाडावे, शेतात पाणी द्यावे. त्याचे पूर्ण विघटन झाल्यावर पुढील रब्बी पिकाची वेळेवर पेरणी करावी.

- हिरवळीचे पीक आंतरपीक म्हणून देखील घेता येते. उदा. कापूस, मका व फळबागेत ताग, धैंचा, बरसीम, चवळी ही हिरवळीची पिके आंतरपीक म्हणून पेरून ६ ते ८ आठवड्यांनी जमिनीत गाडून टाकावीत.

हिरव्या पानांचा वापर करावयाचा असल्यास या पिकांची बांधावर किंवा पडीक जमिनीत लागवड करावी. हिरवी कोवळी पाने गोळा करून ती पूर्व मशागतीच्या वेळी जमिनीत मिसळावीत.

Green Manuering
Organic Farming : सोलापूर जिल्ह्यातील नागनाथ पाटील यांनी सेंद्रिय शेती, जमीन सुपीकतेला दिली चालना

हिरवळीच्या पिकांची लागवड आणि उत्पादन

अ.क्र. ---पीक---लागवडीचा हंगाम--- हरित वनस्पतीचे उत्पादन (टन / हे)---नत्राचे प्रमाण (टक्के)---जमिनीत विरघळणारे नत्र (किलो / एकरी)

१.---बोरू---खरीप--- ८.५०--- ०.४३---३६.५५

२--- धैंचा---खरीप व रब्बी---७.५०---०.४२---३१.५०

३.---चवळी--- खरीप व रब्बी--- ६.०० ---०.४९--- ४४.१०

४.----मूग----खरीप व उन्हाळी---- ३.००----०.५३----१५.९०

५.---उडीद----खरीप---- ३.५०----०.८५----२९.७५

६. ----मटकी----खरीप व रब्बी---- ३.५०---- ०.८५----२९.७५

७.----गवार---- खरीप व रब्बी----६.००----०.३४ ----२७.२०

८---- बरसीम---- रब्बी----४.००---- ०.४३---- १७.२०

९. ---शेवरी--- बारमाही---७.५०--- २.४३---१८२.२५

१०--- गिरीपुष्प---बारमाही---२५ कि/झाड---२.५३---६३० ग्रॅम / झाड

११--- सूबाभुळ ----बारमाही---- २० कि/झाड---- ८.२०---६४० ग्रॅम / झाड

संपर्क - डॉ. पपिता गौरखेडे, ८००७७४५६६६, (अ.भा.स. कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com