
मराठवाड्यात कापूस (Cotton), तूर (Tur), सोयाबीन (Soybean), हळद, ऊस, हरभरा ही पिकं मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. ही पिकपध्दती तिथं आता रूजली आहे.
परंतु आता या नाविन्यपूर्ण आणि चांगला बाजारभाव मिळणाऱ्या पिकांची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
यंदाच्या रब्बी हंगामात (Rabbi Crop) राजमा पिकाला (Rajma Crop) मराठवाड्यातील शेतकऱ्यांची पसंती मिळाली आहे. राजमा हे पिक रब्बी हंगामात मराठवाड्यामध्ये चांगले उत्पादन देणारे ठरले आहे.
त्याचे लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विद्यापीठातर्फे मोहीम राबवली जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून हरभरा उत्पादक शेतकरी मर रोगामुळे त्रासून गेले आहेत. या रोगामुळे हरभरा उत्पादनात मोठी घट होत आहे.
तसेच सरकारच्या धोरणांमुळे हरभऱ्याला चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा राजमा या पिकाकडे मोर्चा वळवला आहे.
शेतकऱ्यांचा कल पाहता परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र आणि शेतकरी उत्पादन कंपन्यांमार्फत राजमा पिकाचा प्रचार व प्रसार केला जात आहे.
या मोहिमेअंतर्गत परभणी तालुक्यात राजमा या पिकाची विविध ठिकाणी लागवड करण्यात आली आहे.
राजमा हे ७० ते ८० दिवसात तयार होणारे पीक असून ते हरभरा पिकाला पर्याय ठरत आहे. राजम्यामध्ये जीवनसत्व व प्रथिने भरपूर प्रमाणात आहेत.
त्यामुळे त्याला बाजारपेठेतही चांगली मागणी आहे.
महाराष्ट्रातील हवामान लक्षात घेता वरुण, फुले राजमा या जाती फायदेशीर असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
राजमा पिकाच्या मुळावर गाठी नसल्यामुळे नत्राची उपलब्धता कमी पडू शकते. त्यामुळे पिकाला गरज पडल्यावर नत्राचा पुरवठा करणे गरजेचे असते.
तांबेरा रोगाव्यतीरिक्त इतर कोणत्याही गंभीर कीड, रोगाचा पिरणाम या पिकावर होत नाही. अशी माहिती विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे डॉ. जी. डी. गडदे यांनी दिली.
राजमा का आहे फायदेशीर?
रब्बी हंगामात राजमा हा हरभऱ्याला चांगला पर्याय ठरू शकतो, असे मत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांनी व्यक्त केलंय.
राज्यात गेल्या काही वर्षांपासून हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक बनलं आहे. पूर्वी रब्बीत हरभऱ्याबरोबर गहू, ज्वारी, मसूर, राजमा, करडई, जवस, मोहरी, सूर्यफूल अशी पिकं घेतली जायची.
पण हळूहळू हरभऱ्याचं क्षेत्र वाढत गेलं. रोगराईचा कमी प्रादुर्भाव आणि भावाची खात्री यामुळे हरभरा राज्यात वाढत गेला. इतर पिकांचं क्षेत्र खूपच घटलं.
करडईसारखी पिकं तर संपल्यातच जमा आहेत. पण आता हरभऱ्यावर मर आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे शेतकरी जेरीस आले आहेत.
तसेच वर्षानुवर्षे हरभरा हे एकच पीक घेतल्यामुळे जमिनीचा कसही कमी होत आहे. त्यातच गेल्या काही हंगामापासून सरकारच्या धोरणामुळे हरभऱ्याला भाव मिळत नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा होत आहे. त्यामुळे शेतकरी रब्बीत हरभऱ्याला पर्यायी पीक शोधत आहेत.
राजमा हे पीक हरभऱ्याच्या तुलनेत कमी कालावधीत हाताशी येते, त्यावर फारसे रोग पडत नाहीत, त्याला पाणीही तुलनेने कमी लागते, भाव चांगला मिळतो, असे डॉ. देशमुख म्हणाले.
राजमा हे पीक सध्या उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू येथेच मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे या पिकाला फारशी स्पर्धा नाही.
म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी राजमा पिकाचा हरभऱ्याला पर्याय म्हणून विचार करावा, असे डॉ. देशमुख म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.