
Shekhar Gaikwad Article एका गावच्या देवस्थानचा (Temple Land) एक म्हातारा पुजारी राहत होता. देवस्थानच्या मालकीची गावात पंधरा एकर जमीन (Agriculture Land) होती. पुजारी देवस्थानची जी जमीन कसत होता ती त्याने विक्रीला काढली होती.
वास्तविक पाहिले तर ती जमीन त्या गावातील देवाच्या नावावर (God's Land) होती आणि पुजारी फक्त त्या जमिनीचा वहिवाटदार होता. सगळ्या गावकऱ्यांना तो पुजारी जमीन त्याची स्वत:चीच असल्याचे सांगत होता.
मागील कित्येक पिढ्यांपासून ती जमीन पुजाऱ्याचे पूर्वज कसत होते. त्यामुळे सगळ्या गावकऱ्यांच्या दृष्टीने असे वाटत होते, की ती शेतजमीन पुजाऱ्याचीच आहे. गावातल्या काही हुशार लोकांनी त्या पुजाऱ्याला अशी विचारणादेखील केली, की अरे, तू शेतजमीन विकल्यावर आपल्या देवाची दिवाबत्ती कशी होणार?
त्यावर तो पुजारी म्हणाला, ‘‘अहो, मी कुठे पळून जातोय?’’ असे लोकांना खोटे सांगून त्या पुजाऱ्याने ती शेतजमीन शेवटी शहरातल्या व्यापाऱ्याला बाजारभावापेक्षा कमी रकमेला विकून टाकली.
जमीन विकल्यानंतर मात्र ती शेतजमीन घेणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव काही जमिनीच्या सातबाराला लागेना. कारण ती होती देवस्थान इनामाची जमीन! ही गोष्ट गावातल्या लोकांना फार उशिरा समजली.
या शेतजमिनीचा व्यवहार बेकायदेशीरपणे पुजाऱ्याने केल्यामुळे काही गावकरी उपोषणाला बसले. काही काळानंतर या जमिनीच्या व्यवहाराची चौकशी जिल्ह्याच्या कलेक्टरने सुरू केली.
त्या चौकशीमध्ये असे निदर्शनास आले, की देवस्थानची अशी जमीन देवाच्या मालकीची असते आणि ती विकण्याचा पुजाऱ्याला कोणताही हक्क नाही.
सांगायचे तात्पर्य असे, की देवस्थान इनामाची जमीन ही देवाच्या मालकीची असते आणि अशी जमीन विकण्यापूर्वी शासनाची आणि धर्मादाय आयुक्तांची अगोदर रीतसर परवानगी घेतली पाहिजे. नाहीतर त्या व्यवहारामध्ये फसवणूक झाली असे समजा.
जमीन तुमच्या मालकीची कशी?
एका लहान गावात नामदेव नावाचा एक शेतकरी राहत होता. त्या गावात शहरात राहणाऱ्या नवीनचंद्र नावाच्या माणसाची एक शेतजमीन होती. ती शेतजमीन नामदेवला विश्वासाने मालकाने बघायला सांगितली. ती जमीन नामदेव स्वतः कसत होता.
१० वर्षांपासून तो जमीन कसत असल्यामुळे नामदेवने त्या जमिनीत विहीर खोदली व सर्व पिके घेतली. काही महिन्यांनी नामदेवने ७/१२ वर पीकपहाणी सदरी स्वतःचे नाव सुद्धा गैरमार्गाने लावून घेतले.
बघता बघता त्याने त्या संपूर्ण जमिनीवर पूर्णपणे ताबा करून घेतला. हे लक्षात आल्यावर काही दिवसांनंतर जमिनीच्या मालकाने नवीनचंद्रने कायदेशीर मार्गाने हालचाली सुरू केल्या.
त्याने प्रथम कसणाऱ्या नामदेव विरुद्ध मनाईचा दावा लावला. नामदेवचा जमिनीत प्रत्यक्ष ताबा आहे, म्हणून दिवाणी न्यायालयाने जमीन मालकाला नामदेवच्या विरोधात मनाई हुकूम दिला नाही.
जमीन मालकाचा मनाईचा दावा दिवाणी न्यायालयाने फेटाळला म्हणून नामदेव तेव्हापासून मीच जमिनीचा मालक आहे, असे गावकऱ्यांना सांगू लागला. काही दिवसांनंतर त्याने परस्पर जमीन विक्रीला काढली.
पण जमीन घ्यायला येणारा प्रत्येक माणूस त्याला विचारायचा, की ही जमीन तुमच्या मालकीची कशी? त्यावर नामदेवकडे कोणतेही उत्तर नव्हते.
तो फक्त इतकेच सांगू शकत होता, की ही जमीन मी तब्बल १० वर्षांपासून कसत आहे. मालकाचा दावा न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे ही जमीन माझीच आहे व पीकपाहणीमध्ये सुद्धा माझेच नाव आहे.
पण हे सांगून तो जमीन विकत घेणाऱ्या लोकांची फसवणूक करत आहे, हे स्पष्ट दिसत होते. सांगायचे तात्पर्य एवढेच, की मालकाचा मनाई दावा फेटाळला म्हणून एखादी व्यक्ती आपोआप त्या जमिनीचा मालक ठरू शकत नाही! अशा वेळी दाव्यामध्ये नक्की कोणता वाद होता, निकाल कोणत्या मुद्यावर झाला, हे सर्व मुद्दे तपासणे अत्यावश्यक आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.