
Indian Farmer Family जुन्या काळातली ही गोष्ट आहे. परबतराव नावाच्या एका बागायतदाराकडे १५० एकर जमीन होती. त्याने आपले सर्व आयुष्य जमीन नांगरून, विहिरी खोदून, ताली उभारून, पाइपलाइन करून, सपाटीकरण करून, कष्ट करून घालवले.
गावांतल्या नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्याची एक तीस एकरच्या स्वतंत्र गटात जमीन (Agriculture Land) होती. त्या जमिनीच्या शेजारी बांधावर (Farm Bund) त्याने हौसेने मोठमोठी आंब्याची रोपे (mango Plantation) आणून लावली. या आंब्याची परबतराव अतिशय काळजी घेत असत.
दरवर्षी या झाडाला आळे करून, खतपाणी घालून वाढविण्याचा प्रयत्न करीत असे. त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्याने लावलेल्या या आमराईचे त्याच्या कुटुंबामध्ये, भावकीमध्ये आणि पूर्ण गावात सुद्धा अतिशय कौतुक होत असे. प्रत्येक उन्हाळ्यात आंबे खाताना ही आजोबांची पुण्याई असल्याची चर्चा नातवंडामध्ये होत असे.
परबतरावच्या मृत्यूनंतर त्याची तिन्ही मुले जमिनीत वाटण्या करून वेगवेगळ्या जमिनी कसू लागले. वाटण्या झाल्या तरी आमराई मात्र कायम स्वरूप राखायची व एकही झाड तोडायचे नाही असा परबतरावच्या मुलांनी निर्णय घेतला. आंब्यांच्या झाडांची रांग बरोबर मध्ये ठेवून परबतरावांची मुले जमिनी कसत होती.
काही दशके लोटली आता परबतरावांची मुले सुद्धा म्हातारी झाली आणि नातवांचे राज्य आले! त्यांनी बांध कोरुन थेट झाडांच्या बुंध्यापर्यंत जमीन कसायला सुरुवात केली. झाडांमुळे वसवा होतो आणि कारण नसताना किती जमीन पडीक राहते याबद्दल सर्व नातू चर्चा करीत.
आता जमिनींचे बाजारभाव चांगलेच वाढले होते. त्यातला एक नातू फार हुशार होता. त्याने हिशोब केला की, एका झाडामुळे किती वसवा होतो आणि पीकपण येत नाही.
झाडांच्या सावलीमुळे पिकाचे उत्पन्न येत नाही, असे म्हणून एका रात्रीत त्याने सर्व झाडे तोडून विकून टाकली. आजोबांची पुण्याई संपून आता नातवांचे कर्तृत्व सुरू झाले होते.
त्याच्या भावाने मात्र रीतसर तहसीलदारांकडे तक्रार केली की, परवानगी नसताना त्याने झाडे तोडली आहेत.
त्या तक्रारीवरून तहसीलदारांनी मंडळ अधिकाऱ्यांना पंचनामा करण्यास व जबाब नोंदवण्यास सांगितले. शेवटी चौकशी करून तहसीलदारांनी त्या नातूविरुद्ध दंडात्मक कारवाईचे आदेश पारित केले.
गावांतले लोक म्हणू लागले, ‘‘आजोबाची पुण्याई आता संपली! काय तर बाबा, तिसरी पिढी!!” थोडक्यात काय तर कायदा आणि त्यामागे वर्षानुवर्षे चालत आलेले शहाणपण विचारात घेऊनच माणसाने पावले टाकली पाहिजेत.
माणूस आणि प्रॉपर्टी या विषयाचा अभ्यास करताना कधी कधी कायद्यापेक्षा शहाणपण अधिक उपयोगी ठरते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.