
Shiroli pulachi Tantamukt village Kolhapur : गाव पातळीवरील छोट्या तंट्यांचे पर्यावसान मोठ्या तंट्यात होऊ नये, म्हणून ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती’ची (Mahatma Gandhi Tantamukt village Samiti) संकल्पना सुरू झाली. प्रोत्साहनासाठी निधी उपलब्ध करून दिला;
मात्र सरकारने सध्या पुरस्कार, बक्षीस व खर्चाचे अनुदान बंद केले आहे. त्यामुळे अनेक गावांतून समितीचे काम थांबले असून, ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमे’ला मरगळ आल्याचे चित्र आहे.
गावपातळीवर शांतता नांदावी, वादामध्ये मालमत्ता अडकून त्यातून आर्थिक नुकसान होऊ नये, कुटुंबांची, समाजाची, गावाची शांतता धोक्यात येऊ नये, आवश्यक तेथे प्रशासनाची मदत घेऊन हे निवाडे केले जावेत यासाठी स्व. आर. आर. पाटील यांच्या कल्पनेतून १५ ऑगस्ट २००७ ला ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम’ सुरू झाली.
यामध्ये राज्यस्तरावर मुख्यमंत्री अध्यक्ष असलेली समिती, पालकमंत्री अध्यक्ष असलेली जिल्हा सल्लागार समिती, जिल्हास्तरीय कार्यकारी समिती, जिल्हाधिकारी अध्यक्ष, तालुका स्तरावर तहसीलदार, पोलिस ठाणे स्तरावर ठाणे अंमलदार, तर गावपातळीवर ग्रामसभेने ठरवलेले अध्यक्ष अशा सहा समित्या कार्यरत आहेत.
यासाठी १५ ते ३० ऑगस्ट या कालावधीत ग्रामसभा घेऊन गावपातळीवरील तंटामुक्ती योजनेचे अध्यक्ष व सदस्यांची निवड केली जाते. सुरुवातीची सात-आठ वर्षे ही योजना चांगली चालली.
त्यामुळे गावपातळीवरील दिवाणी, महसुली, फौजदारी तंटे सोडवण्यात यश आले. उल्लेखनीय काम करणाऱ्या तंटामुक्त गाव समितींना तसेच या योजनेचा प्रचार, प्रसार करणाऱ्या पत्रकारांना पुरस्काराने गौरवण्यात येत होते.
त्यामुळे पुरस्कारासाठी का होईना मात्र गावात वाद वाढू दिले जात नव्हते. परिणामी गावात शांतता नांदू लागली.
सरकारने २०१६-१७ पासून पुरस्कार देणे बंद केले आणि हळूहळू तंटामुक्त समितीचे काम कमी होऊ लागले. आज अनेक गावांत समितीचे काम कागदोपत्री सुरू असल्याचे चित्र आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.