Team Agrowon
शरीरात तयार होणारी ऊर्जा जनावर बाहेर टाकत असते परंतु अशा वेळेस बाहेरील तापमान वाढल्याने ऊर्जा बाहेर टाकण कठीण होते. त्यातच बाहेरील ऊर्जेचा अधिक भार वाढल्याने जनावराच्या ऊर्जा निस्सारण यंत्रणेवर परिणाम होतो.
संकरित जनावराच्या हार्मोन्स निर्मितीत बदल होतो, त्यामुळे दूध उत्पादन,आरोग्य, आहार आणि प्रजननावर विपरीत परिणाम होतो.
शरीरातील अन्नघटक हे तापमान नियंत्रणासाठी वापरल्याने जनावर अस्वस्थ होते. आहार कमी होऊन तहान, भूक मंद होते. जनावर तापमान नियंत्रण करण्यासाठी स्वतःची यंत्रणा वापरण्यास सुरवात करते. यामध्ये श्वासोच्छ्वासाचा दर वाढून धाप लागल्यासारखे करते. तोंडाने श्वासोच्छ्वास करते. श्वासोच्छ्वास उथळ, जास्त वेगाने होतो. नाडीचा वेग वाढतो.
जनावर स्वत: तपमान नियंत्रण करण्यापलीकडे जाते. शरीराचे तापमान १०४ ते १०६ अंश फॅरानहाइट वाढून कातडी कोरडी पडते. डोळे लालसर होतात, डोळ्यांतून पाणी गळते. पित्ताचा त्रास होऊन अतिसार होण्याची शक्यता असते. लघवीचे प्रमाण कमी होते. जनावरे बसतात. गाभण गायी गाभडण्याचे प्रमाण वाढते.
ज्या वेळेस तापमान ३५ अंश सेल्सअसपेक्षा जास्त होते, त्यावेळेस दूध उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते आणि जेव्हा हेच तपमान ४० अंश सेल्सअसपेक्षा जास्त जाते त्या वेळेस दूध उत्पादनामध्ये ५० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. योग्य काळजी न घेतल्यास ही घट वाढत जाते.
उष्णतेच्या परिणाम वासरे, कालवडींच्या वाढीवर अधिक प्रमाणात होत असतो. दुधातील स्निग्धांश व प्रथिनाचे प्रमाण कमी होते. आहार कमी होतो.
प्रजनन यंत्रणेवर परिणाम होते. उष्णतेचा ताण असणारी गाय माजावर येत नाही. गाभण राहण्यास अडचणीचे ठरते. गाभण गाईंना उष्णतेचा ताण बसल्यास गर्भपात होऊ शकतो किंवा अकाली प्रसूती होऊ शकते. खुरांचे आजार तसेच लंगडेपणा वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्त तापमानात संकरित गायींची अधिक काळजी घ्यावी लागते