महारुद्र मंगनाळे
आज सकाळपर्यंतच्या पावसाची नोंद २९ मि.मी.झाली.कालचा आणि आजचा मिळून दोन इंच पाऊस झालाय.आंब्यासह,फळबागांचं काही उभ्या पिकांचं नुकसान हे लगेच दिसणारं नुकसान आहे.
पण हे सततचं पावसाळी वातावरण आणि पाऊस खरिप हंगामासाठी बराच त्रासदायक ठरू शकतो.उन्हानं जमीन भाजून, तळून निघाली की,पिकं जोमदार येतं,हे वाक्य मी शेतीत अनेकदा ऐकलं, त्याची प्रचितीही घेतलीय.
आता अशा वातावरणामुळे जमिन ना भाजली जाते ना तळली जाते. याचा फटका बसेलच.शिवाय या वातावरणामुळे मान्सून चांगला राहिल याबाबत अनिश्चितता आहे.
त्यातही बहुतेक हवामान संस्थांचे अंदाज प्रतिकूल आहेत.एलनिनोच्या प्रभावामुळे पावसात मोठा खंड, कमी वेळात भरपूर पाऊस असा अंदाज व्यक्त झालायचं. त्यामुळे मी तरी खरीपाचं नियोजन,कमीत कमी खर्च असंच करतोय.जोखीम जास्त असेल तर, गुंतवणूक कमी हाच फायदा ठरतो.
शेतकऱ्यांचा आक्रोश नि रडणं वाढतच चाललयं.पण त्याकडं लक्ष द्यायला राज्यकर्त्यांना वेळ नाही, इच्छाशक्ती नाही.त्यामुळं सरकारकडून मदतीची अपेक्षा करणं भाबडेपणा आहे.प्रत्येकाने आपापल्या पातळीवर नियोजन करणं व संकटाचा सामना करण्याची तयारी ठेवणं,हा एकमेव पर्याय आहे.
शेतकऱ्यांना,बळीराजा,शेतकरी राजा,जगाचा पोसिंदा म्हणणाऱ्या लोकांची कीव येऊ लागलीय.खरं तर असे शब्द वापरताना त्यांना लाज वाटायला हवी.असं म्हणणं म्हणजे शेतकऱ्यांची टवाळी करणं आहे.
रुद्रा हटवरचा पिंपळ कोवळ्या, लुसलुशीत लालसर पानांनी बहरलाय.वाऱ्याने त्याची पानं हलू लागली की, कानाला छान संगीत ऐकू येतं,तीच काय ती समाधानाची बाब.