
शेतकरी ः गणेश बाळकृष्ण अंत्रे
गाव ः सोनगाव (सात्रळ) ता. राहुरी, जि. नगर
एकूण गाई ः १३
कालवडी ः १९
नगर जिल्ह्यातील सोनगाव (ता. राहुरी) येथील राजेश बाळकृष्ण अंत्रे व गणेश बाळकृष्ण अंत्रे यांनी शेतीला पूरक जोड म्हणून दूध व्यवसाय (Dairy Business) निवडला. राजेश यांचे पदव्युत्तर तर गणेश यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. वडिलोपार्जित पाच एकर बागायती शेती (Agriculture) असून पारंपरिक दूध व्यवसाय होता.
अठरा वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. दोघा भावांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी न करता वडिलांनी सुरू केलेला दुग्ध व्यवसाय वाढविण्याचा निर्णय घेतला.
त्या वेळी त्यांच्याकडे तीन गाई होत्या. योग्य व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करत गोठ्यातील गायींची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवीत नेली.
शेती विविध कामांमध्ये आणि दुग्ध व्यवसायाला वेळोवेळी आई लता यांचे पाठबळ मिळाले. गाईंसाठी मुक्तसंचार गोठ्याची उभारणी केली. आज गोठ्यामध्ये लहानमोठ्या मिळून सुमारे ३० गायी आहेत. सध्या प्रतिदिन २०० लिटर दुधाचे संकलन होते.
गोठ्याची उभारणी
२०१३ मध्ये सर्व तांत्रिक बाबी विचारात घेऊन गोठ्याच्या उभारणीला सुरुवात केली. प्रत्येक गाईला २०० स्क्वेअर फूट इतकी जागा मिळेल यानुसार ६० बाय ८० फूट आकाराचे दोन गोठे उभारले.
गायींना गव्हाणीत टाकलेला चारा बऱ्याच वेळा वाया जात असे. त्यासाठी दीड बाय दोन अशा शंभर फूट लांबीच्या चारा गव्हाणी बांधल्या.
त्यामुळे चारा वाया जाण्याचे प्रमाण कमी झाले. तसेच गायींना जमिनीच्या पृष्ठभागावरील चाराही सहज खाता येऊ लागला.
खाद्य व्यवस्थापन
गायीला दररोज दिल्या जाणाऱ्या चाऱ्यातून सर्व पोषक घटकांचा पुरवठा होत नाही. त्यासाठी खुराकाच्या माध्यमातून पोषक घटकांची गरज भागविली जाते. मात्र सरसकट खुराक न देता गायींच्या दूध उत्पादन क्षमतेनुसार खुराकाची मात्रा ठरविली जाते. प्रतिदिन २० लिटर दूध देणाऱ्या गायीला साधारण ७ किलो खुराक दिला जातो.
दर दिवसाला खनिज मिश्रण ५ ग्रॅम याप्रमाणे दिले जाते.
चाऱ्यामध्ये हत्तीगवत, मेथीघास, मुरघास व गव्हाचा भुस्सा हे सर्व एकत्रित करून त्यांचे मिश्रण गायींच्या वजनानुसार दिले जाते. साधारण ५०० किलो वजनाच्या आणि २० लिटर दूध देणाऱ्या गायीला दिवसभरात २५ किलो हिरवा चारा व ४ किलो वाळलेला चारा दिला जातो.
लसीकरणावर भर
लम्पी स्कीन आजारासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मागील ३ वर्षांपासून लसीकरणावर भर दिला आहे. यंदा चार महिन्यांपूर्वी लसीकरण केले.
मागील आठवड्यात लाळ्या खुरकूतचे लसीकरण केले.
गर्भपात टाळण्यासाठी ब्रुसेलोसिसच्या लसीकरण वेळेवर केले जाते. कालवडींना साधारण चार महिने वयापासून ते सात महिने वयापर्यंत लसीकरण केले जाते.
दर चार महिन्यांतून एक वेळ जंत निर्मूलन केले जाते.
वासरू जन्मानंतर पंधराव्या दिवशी व त्यानंतर एक वर्ष वयाचे होईपर्यंत दर महिन्याला जंत निर्मूलनासाठी लसीकरण केले जाते.
गाईंचे खूर छाटणी करण्यासाठी अत्याधुनिक यंत्राची खरेदी केली आहे. जेणेकरून खूर छाटणीवेळी गायींना इजा होणार नाही. वर्षातून एकदा खूर छाटणी केली जाते.
सर्व गाईंना इअर टॅगिंग केले आहे. त्यामुळे गायी वेत, दूध या सह आरोग्यविषयक बाबींची माहिती मिळण्यास मदत होते.
सर्व गाईंना इअर टॅगिंग केले आहे. त्यामुळे गाय माजावर आली तरी कळते. लगेच वेळेत सिमेन्स भरण्यात येते. गाय आजारी असली तरी सेन्सरमुळे कळते.
नवजात वासरांची काळजी
गाभण गायींना दररोज सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी एक किलो प्रमाणे खुराक दिला जातो.
गाईच्या प्रसूतीसाठी स्वतंत्र वार्ड उभारला आहे.
नवजात वासरांची शास्त्रीय पद्धतीने नाळ कापली जाते. त्यानंतर एका तासाच्या आत बाटलीद्वारे गायीचे दूध पाजले जाते.
नाळ कापलेल्या जागी जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी योग्य काळजी घेतली जाते.
जन्माच्या ५ दिवसांनंतर त्यांना पुरेसे पाणी दिले जाते. १५ व्या दिवसापासून गोळी पेंड दिली जाते. ती साधारण वासरू ३ महिन्यांचे होईपर्यंत सुरू ठेवतात.
नवजात वासरांना किमान २ महिने त्यांच्या वजनाच्या १० टक्के दूध पाजले जाते.
नवजात वासरांचे सुरुवातीचे दोन महिने स्वतंत्र ठिकाणी व्यवस्थापन केले जाते. त्यासाठी काफ बॉक्स उभारले आहेत.
वासरू दीड महिन्याचे झाल्यानंतर डीव्हर्मिंग केले जाते.
- गणेश अंत्रे, ९७६३०४२४७०
(शब्दांकन ः सूर्यकांत नेटके)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.