
नाशिक : गत रब्बी उन्हाळ कांदा हंगामात (Rabi Onion) जिल्ह्यात २ लाख १६ हजार हेक्टरवर लागवडी (Onion Cultivation) होत्या. त्यात ५० हजार हेक्टरने क्षेत्र वाढल्याचे दिसून आले. मात्र कांदा काढणीपश्चात उत्पादनावर (Onion Production) परिणाम दिसून आला. एकरी उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटले. त्यामुळे सुरुवातीला दरवाढीच्या आशेने प्रतवारी करून कांदा साठवला. (Onion Storage) मात्र त्यात ४० टक्क्यांवर सड (Onion Rotted) होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.
एकीकडे शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने कांदा साठवला, मात्र त्यास उत्पादन खर्च वसूल होईल इतका भाव मिळत नाही. त्यामुळे एकीकडे सड होऊन माल संपुष्टात येत आहे तर दुसरीकडे दर नसल्याने तो चाळीतच ठेवल्याने नुकसान वाढत आहे. शेतकऱ्यांनी आर्थिक गरजेनुसार खरीप हंगामापासून टप्प्याटप्प्याने कांदा विकला. मात्र त्यांना अपेक्षित परतावा मिळाला नसल्याची स्थिती आहे.
शेतकऱ्यांचा निम्मा कांदा विकला गेला मात्र तोही तोट्यात असे विक्री व मोबदल्याचे व्यस्त चित्र आहे. उरलेला कांदा दोन पैसे देऊन जाईल अशी अपेक्षा असताना डोळ्यासमोरच कांदा काळपट पडून त्याची टरफले निघून जात आहेत. तर काही कांदा चाळीमधून अक्षरशः काळे पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे कांद्याचा साठा संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
एकरी कांद्याच्या उत्पादनात अपेक्षित उत्पादन हाती आलेले नव्हते. त्यात मालाला आकार नाही; गोल्टी व चिंगळीचे प्रमाण अधिक व रंग नसल्याने तुलनेत आकर्षकपणा कमी होऊन मालाची दुय्यम प्रतवारी माल अधिक होता. असे असताना कांदा साठवणूक करताना कांदा निवडून चाळीत साठवला. त्यास ४ ते ५ महिने होऊन गेले आहेत. आता बाजारात मिळणाऱ्या दरात उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने आर्थिक कोंडी झाली. त्यातच सड वाढल्याने फटका बसत आहे.
निफाड, येवला, सिन्नर, सटाणा, कळवण, मालेगांव, देवळा, चांदवड, नांदगाव, दिंडोरी या भागात नुकसान वाढते आहे. काही शेतकऱ्यांचे जवळपास ९० टक्के नुकसान आहे. त्यामुळे साठवलेला कांदाही सडत असल्याने नुकसान सोसावे लागत आहे. तर कांदा विक्रीसाठी बाजारात आणावा त्यातही खर्च करून अपेक्षित दर मिळत नसल्याने अर्थकारण कोलमडले आहे.
शेतकरी म्हणतात, पुन्हा उभे कसे राहायचे
कांद्याला गुणवत्तेअभावी बाजारात उठाव नाही. प्रतिकूल वातावरण, अतिवृष्टी, मजूरटंचाईमुळे उत्पादनखर्च दुपटीने वाढूनही उत्पन्न निम्म्यावर आले आहे. त्यामुळे उत्पन्नाचे गणित कसे जुळवायचे ५० टक्के नुकसान आहे. असाच जर पाऊस चालू राहिला तर अजून खराब होतील, पुन्हा कसे उभे राहायचे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.