
Ginger Market Update गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मेटाकुटीला आलेल्या आले उत्पादक शेतकऱ्यांना दरातील (Ginger Rate) सुधारणेमुळे दिलासा मिळत आहे.
उत्पादनात झालेली घट आणि बाजारात वाढलेली मागणी यामुळे गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत आल्याला यंदा सर्वाधिक दर मिळत आहे.
आले पिकाच्या प्रति गाडीस (५०० किलो) मालाच्या प्रतवारीनुसार ६३ ते ६५ हजार रुपये दर मिळत आहे. हा दर विक्रमी असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
गेली चार वर्षे आले पिकाच्या दरात कायम घसरण होत होती. त्यामुळे आले उत्पादकांना सलग पाच ते सहा वर्षे मोठा आर्थिक फटका बसला. दराच्या घसरणीच्या कालावधीत शेतकरी चांगला नफा मिळेल या आशेने आले पिकासाठी लाखो रुपयांचा भांडवली खर्च करत होते.
मात्र बाजारात योग्य दर मिळत नसल्याने आले पीक आतबट्ट्याचे ठरत होते. परंतु जानेवारी महिन्यापासून आल्याच्या दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली. जानेवारी महिन्यात प्रतिगाडी १५ ते १६ हजार रुपयांपर्यंत आले पिकास दर मिळाला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दरात सुधारणा होत गेली.
आले लागवडीसाठी आले बियाणे काढणी सुरू असताना, आले (धुणीच्या) दरात आणखी वाढ झाली होती. या काळात बियाण्याचे दर ३५ ते ३६ हजार रुपये प्रतिगाडीस मिळत होते. यावेळी धुणीच्या आल्याचे दर २८ ते २९ हजारांवर गेले होते. २१ ते ३१ मार्च या काळात आले खरेदीकडे लक्ष कमी झाल्याने पिकाच्या दरात घट झाली होती.
आल्याच्या दरात कमालीची लवचिकतता असते. पुढील काळात दरात घसरण होईल, असे वातावरण झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आले विक्रीस प्राधान्य दिले होते. मात्र एप्रिल सुरू झाल्यापासून पुन्हा दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली आहे.
सध्या आले पिकास विक्रमी म्हणजे प्रतिगाडीस ६३ ते ६५ हजार रुपये दर मिळत आहे. मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात गाडीमागे जवळपास दरात दुपटीने वाढ झाली आहे.
दरम्यान, एखाद्या पिकाला उच्चांकी दर मिळू लागला की काही अनधिकृत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होण्याच्या घटना वाढतात. सध्या आल्याच्या गाडीला उच्चांकी ६५ हजार रुपये दर मिळत आहे.
प्रति एकर सरासरी पंधरा ते वीस गाड्यांचा उतार धरला तरी व्यवहाराची रक्कम जवळपास १० ते १२ लाखांच्या घरात जाते. परिणामी आले खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.
त्यामुळे आले उत्पादक शेतकऱ्यांनी ज्या व्यापाऱ्यांचे बाजारपेठेतील दैनंदिन व्यवहार चोख असतील आणि जे बाजार समिती व पणन संचलनालयाचे नोंदणीकृत व्यापारी असतील अशाच खात्रीशीर व्यापाऱ्यांना आल्याची विक्री करणे आवश्यक आहे. जेणेकरून संभाव्य फसवणूक टाळली जाईल.
सध्या उच्च दर्जाच्या आल्याची परदेशात मागणी वाढली आहे. मागच्या वर्षी भारतातून मसाल्याची जेवढी निर्यात झाली, त्यात आल्याचा समावेश जास्त होता. आल्यापासून तयार होणारा सुंठदेखील बाजारात रूबाब दाखवत आहे.
देशातील जवळपास सर्व मोठ्या शहरांतील बाजारपेठांमध्ये आल्याची मागणी कायम आहे. त्यामुळे भविष्यातदेखील आले शेती आणखी फायदेशीर ठरेल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
तब्बल दहा वर्षांनंतर विक्रमी दर
आले पिकाच्या दराने २०१२ नंतर प्रथमच यंदा ६० हजारांचा टप्पा पार केला आहे. २०१२ नंतर काही काळ दर टिकून होते. कोरोनाच्या संसर्गापासून मात्र दरात मोठी घसरण होत गेली. या काळात नीचांकी चार ते पाच हजार रुपये दर मिळाला होता.
यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हे पीक बंद केले होते. मात्र यावर्षी जानेवारीपासून दरात सुधारणा होत गेली. तब्बल दहा वर्षांनंतर आल्याने ६० हजार रुपये दराचा विक्रम मोडीत काढला आहे. सध्या प्रति गाडीस ६३ ते ६५ हजार रुपये दर मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.